
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कठोर कारवाई करत त्यांचा बँकिंग परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत हा परवाना रद्द करण्यात आला असून, आता ही बँक भारतात बँकिंग व्यवहार करण्यास पात्र राहणार नाही. आरबीआयने आपल्या आदेशात या कारवाईमागील स्पष्ट कारणे नमूद केली आहेत. बँकेचे कामकाज आणि व्यवस्थापन हे ठेवीदारांच्या हितासाठी नुकसानकारक असल्याचे आरबीआयला आढळून आले. पेमेंट बँक परवान्यासाठी आवश्यक असलेल्या अटींचे पालन करण्यात बँक वारंवार अपयशी ठरली.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेचे कामकाज हे ठेवीदार आणि सार्वजनिक हिताच्या विरोधात चालले होते. वारंवार सूचना देऊनही बँकेच्या व्यवस्थापनाने अटी व शर्तींचे पालन केले नाही. बँकेचे चारित्र्य आणि कार्यपद्धती ठेवीदारांच्या हितासाठी घातक ठरत असल्याने हा परवाना रद्द करणे अनिवार्य असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. व्यवस्थापनावरील अविश्वास आणि वारंवार समोर येणाऱ्या तांत्रिक आणि वैधानिक त्रुटी हे या निर्णयामागचे मुख्य कारण आहे.
आरबीआयने 2022 मध्ये सुरुवातीला बँकेला नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर 2024 मध्ये खात्यांमध्ये नवीन ठेवी स्वीकारण्यावर कडक निर्बंध लादण्यात आले, परंतु व्यवस्थापनावरील अविश्वास आणि वारंवार समोर येणाऱ्या तांत्रिक आणि वैधानिक त्रुटी पाहता आरबीआयने आता परवानाच रद्द करूनम दिले आहेत. आरबीआयने खात्री दिली आहे की, बँकेकडे तिच्या सर्व दायित्वांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. तसेच, मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या प्रक्रियेसाठी आरबीआय उच्च न्यायालयात धाव घेणार आहे.
RBI ने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, बँक पूर्णपणे बंद करण्यासाठी आम्ही हायकोर्टात अर्ज दाखल करणार आहेत. याचा अर्थ येत्या काळात बँकेचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते. ही प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पूर्ण केली जाईल, जेणेकरून सर्व नियमांचे पालन होईल.
पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द केल्याचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. पेटीएमचे शेअर्स हलक्या घसरणीसह 1,153 रुपयांवर बंद झाले. जरी ही घसरण मोठी नसली तरी गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात कंपनीला आणखी आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर आता समोर प्रश्न उपस्थित राहत आहे की, ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतील का? महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकरणांमध्ये RBI ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करते. आता ग्राहकांना अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवण्याचा आणि घाबरण्याऐवजी योग्य निर्णय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे घाबरुन न जाता यासगळ्यावर ग्राहकांना शांतपणे निर्णय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.