
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
नियमांनुसार, भारतातील विमानांमध्ये केवळ काही परवानाधारक शस्त्रे नेण्याची परवानगी आहे. यामध्ये पिस्तूल, बंदुका किंवा इतर परवानाधारक शस्त्रांचा समावेश आहे. पण कठोर अटींचा देखील समावेश आहे. त्यांच पालन करणे आवश्यक आहे. प्रवासी स्वतःसोबत किंवा केबिन बॅगेजमध्ये शस्त्रे बाळगू शकत नाहीत. शस्त्रे केवळ मुख्य सामानात किंवा कार्गोमध्ये नेली जाऊ शकतात.
शस्त्रे बाळगणाऱ्या प्रवाशांनी एअरलाइनच्या चेक-इन काउंटरवर आपल्या शस्त्रांची आणि दारूगोळ्याची माहिती देणे आणि आवश्यक परवाने व इतर कागदपत्रे सोबत बाळगणे बंधनकारक आहे. शिवाय, नियमांनुसार शस्त्रे आणि दारूगोळा स्वतंत्रपणे पॅक करणे आवश्यक आहे. तसेच, दारूगोळा मोकळा वाहून नेता येत नाही. कोणताही धोका टाळण्यासाठी तो व्यवस्थित पॅक करून सुरक्षित करणे आवश्यक आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसने म्हटले आहे की, प्रवासी आवश्यक सुरक्षा आणि संरक्षणाच्या अटींची पूर्तता करत असल्यास, ते त्यांच्या चेक-इन बॅगेजमध्ये एक परवानाधारक रिव्हॉल्व्हर, पिस्तूल किंवा शॉटगन आणि ठराविक संख्येने काडतुसे बाळगू शकतात. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, एअरलाइनच्या सध्याच्या नियमांनुसार अशा वस्तूंसाठी ५ किलोग्रॅम वजनाची मर्यादा आहे.
आता टाटा ग्रुपचा भाग असलेल्या एअर इंडियाच्या बाबतीत, संरक्षण दल, निमलष्करी दल, पोलीस आणि सीमाशुल्क अधिकारी यांना सूट देण्यात आली आहे. ही एअरलाइन स्पर्धांसाठी किंवा देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या खेळाडूंना सवलत देखील देते. एअर इंडियाच्या देशांतर्गत विमानांमध्ये, सामान्य प्रवाशांना प्रति शस्त्र आणि ५० काडतुसेसाठी ₹५,००० शुल्क भरावे लागते. आंतरराष्ट्रीय विमानांसाठी, हे शुल्क अंदाजे ₹१०० आहे.