
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
यापूर्वी रेल्वेमध्ये कोच अटेंडंट होण्यासाठी किमान १० वी उत्तीर्ण असणे पुरेसे होते. मात्र, आता नवीन नियमांनुसार या पदासाठीची पात्रता वाढवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यात आला आहे आता केवळ १२ वी उत्तीर्ण उमेदवारच या पदासाठी अर्ज करू शकतील. या पदासाठी तांत्रिक पात्रतादेखील आवश्यक आहे. १२ वी सोबतच उमेदवाराकडे ITI (आयटीआय) प्रमाणपत्र असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्याचसोबत विशेष प्रशिक्षणदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. उमेदवाराने हाऊसकीपिंगशी संबंधित किमान ३ महिन्यांचे प्रशिक्षण (Training) घेतलेले असणं आवश्यक आहे.
रेल्वे बोर्डाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे संचालक लव कुमार यांनी सर्व रेल्वे झोनच्या महाप्रबंधकांना पत्र पाठवून ही नवीन व्यवस्था लागू करण्याचे आदेश दिले आहेत. यामागील मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
१. सेवेचा दर्जा सुधारणे: १० वी पास पात्रता असताना अनेकदा प्रवाशांकडून सेवेच्या गुणवत्तेबाबत तक्रारी येत होत्या. पात्रता वाढवल्यामुळे अधिक सक्षम कर्मचारी मिळतील. इतर स्कील्स आवश्यक असल्याने त्याचाही सेवेत फरक जाणवेल.
२. आधुनिक गाड्यांचे आव्हान: सध्या भारतीय रेल्वे ‘नमो भारत’ आणि ‘अमृत भारत’ सारख्या प्रगत गाड्या चालवत आहे. या गाड्यांमधील प्रवाशांच्या अपेक्षा जास्त असतात, त्या पूर्ण करण्यासाठी तांत्रिक समज असलेले कर्मचारी आवश्यक आहेत.
३. तांत्रिक कामात मदत: आयटीआय अनिवार्य केल्यामुळे कोच अटेंडंट आता डब्यातील लाईट, सीट किंवा इतर उपकरणांमधील छोटे-मोठे तांत्रिक बिघाड स्वतः दुरुस्त करू शकतील. त्यामुळे या गोष्टींचा विचार करुन हे बदल करण्यात आले आहेत.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोच अटेंडंटची भरती थेट रेल्वेमार्फत केली जात नाही. यासाठी रेल्वे खाजगी एजन्सींची (Private Agencies) मदत घेते. मात्र, आता या एजन्सींनाही नवीन नियमांनुसार १२ वी पास आणि आयटीआय असलेल्या उमेदवारांचीच निवड करावी लागणार आहे. नवीन धोरणानुसार, कोच अटेंडंट आता केवळ सेवा देणारे कर्मचारी नसून ते आपल्या डब्यात एका ‘सुपरवायझर’च्या भूमिकेत असतील. प्रवाशांच्या समस्या समजून घेऊन त्या त्वरित सोडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. त्यामुळे ही एक जबाबदारी असणार आहे.