
"भांडी, चहा आणि बदलाची सुरुवात...", ‘मीना राजू मंच’ने बदलली विचारसरणी, घरकामातून दिला लिंगसमतेचा संदेश
धाराशिव जिल्ह्यातील वडगाव गावात प्रत्येक सकाळ घडाळ्याच्या अलार्मच्या आवाजाने किंवा शाळा-नोकरीसाठी बाहेर पडायचंय या गडबडीने सुरू होत नाही. इथल्या सकाळची सुरूवात होते ती भांडी घासण्याच्या आवाजाने आणि चहासाठी ठेवलेल्या आधणाने. जिल्हा परिषद शाळेत आठवीत शिकणारा हृषिकेश शिंदे हा आपल्या दिवसाची सुरुवात कुटुंबासाठी चहा बनवून, आदल्या रात्रीची भांडी धुऊन आणि कधी कधी घरासाठी किराणा आणण्यासाठी दुकानात जाऊन करतो. त्याच्या वयाच्या मुलांसाठी हे काम मुली किंवा स्त्रियांचं आहे. पण हृषिकेशसाठी हे काम आता अभिमान आणि तत्त्वाचा प्रश्न आहे. फक्त एक वर्षापूर्वीपर्यंत हृषिकेशने वर्गातील कोणत्याही मुलीशी कधीच संवाद साधला नव्हता. ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक मुलांप्रमाणे त्याचाही विश्वास होता की घरकाम हे “बायकांचं काम” आहे आणि मुलांना ते करण्याची गरज नाही. लिंग समाभाव ही संकल्पनाच त्याला माहित नव्हती.
Exclusive Series: आंबेवाडी गावात मुलांच्या नेतृत्वाखाली ‘शून्य बालविवाह …
हा बदल घडला तो मीना राजू मंच या उपक्रमामुळे.धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली तीन वर्षे अंगाई-युनिसेफतर्फे (UNGEI-UNICEF) लिंग समभाव हा विषय खेळाधारित शिक्षणाद्वारे किशोरवयीन मुले-मुली, शिक्षक आणि गावातील समुदायांना शिकवण्यात आला. मीना राजू मंच हा कार्यक्रम इयत्ता ६ ते ८ वीचे विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आला असून लिंग समभावाशी संबंधित विविध पैलूंची माहिती त्यांना करून देण्यात येते. त्यामध्ये संवाद, खेळ, चर्चा अशा विविध उपक्रमांचा समावेश असतो. या कार्यक्रमात स्थानिक संस्था स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी), कोरो आणि मावा यांचा सहभाग होता. त्यामध्ये शाळांसोबतच ग्रामपंचायत, गावातील लोक आदींनाही सहभागी करून घेण्यात आलं.
हृषिकेशसाठी हा अनुभव डोळे उघडणारा ठरला. तो म्हणतो, “हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता. आम्ही आरोग्य, लिंगभेद, शरीररचना, परंपरा यांसारख्या विषयांवर चर्चा केली. याबद्दल इतक्या मोकळेपणाने आम्ही घरी किंवा शाळेत कधीच बोलत नव्हतो. मला जाणवलं की मुलींसाठी परिस्थिती किती अन्यायकारक आहे.”
मीना राजू मंचच्या एका सत्राने त्याच्यावर विशेष प्रभाव टाकला. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मानवी शरीराचं चित्र काढायला सांगितलं गेलं. सुरुवातीला कुणीही प्रजनन अवयव काढले नाहीत. “आम्हाला खूप लाज वाटत होती,” तो सांगतो. पण वैज्ञानिक आणि वयोगटाला साजेशा चर्चेमुळे वातावरण बदललं. “आता मला समजलं की शरिराचे अवयव हे सामान्य आहेत. त्याबद्दल जाणून घेण्यात किंवा बोलण्यात लाज नाही.”
या अनुभवातून प्रेरित होऊन हृषिकेशने घरी छोटे बदल सुरू केले. त्याची आई शेतात कष्ट करते आणि घरकामही सांभाळते. हृषिकेशने तिला मदत करायला सुरुवात केली. सुरुवातीला गावातील लोकांनी त्याची खिल्ली उडवली. “मुलगा हे काम थोडीच करतो? ही मुलांची कामं नाही,” असे टोमणेही मारले. पण तो ठाम राहिला. तो म्हणतो, “मी काम करत राहिलो आणि सगळ्यांना सांगत राहिलो, काम म्हणजे काम असतं त्यात काही भेदभाव नको.” हळूहळू त्याचा परिणाम दिसू लागला. त्याचे काही मित्रही घरकाम करू लागले. कपडे धुणं, भात शिजवणं, अंगण साफ करणं, अशी कामं तेही घरी करू लागले. “ मीना राजू मंचच्या स्वयंसेविका ताईंनी आम्हाला दाखवलं की आपणच भेदभाव निर्माण करतो आणि एकमेकांना कमी लेखतो, ” तो सांगतो.
घराच्या पलीकडेही हृषिकेशने आपली भूमिका स्पष्ट केली. गावातील “उत्सव समतेचा” कार्यक्रमात त्याने लिंगभेदाविरुद्ध भाषण केलं. त्याच्या बोलण्याला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. “गावातल्या लोकांनी माझं कौतुक केलं. त्यांनी हे मान्यं केले की, माझे विचार माझ्या वयापेक्षा पुढचे आहेत,” तो हसत म्हणतो.
आता त्याच्या शाळेतही अनेक बदल दिसतात. आधी मुलं आणि मुली वेगळे बसत असत. आता ते एकत्र बसतात, खेळतात आणि संवाद साधतात. शिक्षकही सर्वसमावेशक वातावरणाला प्रोत्साहन देतात. मीना राजू मंच इतका लोकप्रिय झाला आहे की विद्यार्थी स्वतः स्वयंसेविका ताईंना फोन करून बोलावतात. “आम्ही दर आठवड्याला त्यांना बोलावतो. त्या आल्या नाहीत तर त्यांना फोन करतो. त्यांच्या सोबत आम्ही आमचे प्रश्न, स्वप्नं आणि भीती मोकळेपणाने सांगू शकतो. त्यांच्याशी खूप चांगली मैत्री झाली आहे,” हृषिकेश सांगतो.
Exclusive Series: मुलगे साडीची घडी घालतात आणि मुली हाती हातोडा घेतात ..
त्याने आपल्या नातेवाईकांमध्येही लिंग समभावाबद्दल संवाद सुरू केला आहे. आपल्या चुलत बहिणींना समान शिक्षण आणि संधी मिळाव्यात यासाठी तो आग्रह धरतो. “खरा बदल हवा असेल तर तो घरापासूनच सुरू व्हायला हवा,” तो म्हणतो.
हृषिकेशने त्याच्या आयुष्यात केलेल्या छोट्या बदलाने त्याचं संपूर्ण कुटुंब प्रभावित झालं आहे. त्याच्या या छोट्या छोट्या कृतींमध्ये समाज बदलण्याची ताकद आहे. या सगळ्यामागे लिंग समभावाचा एक विचार प्रामुख्याने दिसून येतो. सातत्याने साधलेला संवाद आणि न घाबरता विचारलेले प्रश्न इतरांनाही विचार करायला भाग पाडतात. हृषिकेशने या लहान वयातच विचारांच्या साथीने मोठी झेप घेतली आहे. भविष्यात त्याच्यासारखे नेतृत्वच हा विचार पुढे घेऊन जाऊन समाजाला सर्वार्थाने बदलण्याची आणि सर्वसमावेशक बनवून समता प्रस्थापित करण्याची ताकद ठेवते.
संकलनः श्रुति गणपत्ये, माध्यम सल्लागार, युनिसेफ महाराष्ट्र