लिंग समानता दाखविण्यासाठी विविध खेळ (छायाचित्र: फैसल मग्रे)
धाराशिव जिल्ह्यात २०२२ पासून अंगाई-युनिसेफतर्फे (UNGEI-UNICEF) लिंग समभाव (जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह प्रोग्रॅम) किशोरवयीन मुले, शिक्षक आणि समुदायांसाठी राबवण्यात आला. देशात प्रथमच प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमात १२० शाळा, ८०० हून अधिक शिक्षक आणि सुमारे १८ हजार विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मीना राजू मंच’च्या माध्यमातून लिंग समभावाशी संबंधित विविध पैलूंची माहिती त्यांना करून देण्यात आली. त्यामध्ये संवाद, खेळ, चर्चा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. राज्य शिक्षण विभागाच्या शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला. या कार्यक्रमातून खेळाधारित शिक्षणातून लिंगभेदाच्या रूढींना आव्हान देण्यासाठी सक्षम केले. मीना राजू मंच जो इयत्ता ६वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवला जातो. या कार्यक्रमाला स्थानिक संस्था स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी), कोरो आणि मावा यांचा सहभाग होता. त्यामध्ये शाळांसोबतच ग्रामपंचायत, गावातील लोक आदींनाही सहभागी करून घेण्यात आलं.
खेळ आणि संवाद या माध्यमांतून लिंग समभावाचे धडे दिल्याने ते मुलांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचू शकतात, असे दिसून आले. त्यासाठी मुलांच्या रोजच्या खेळातील काही खेळ, उपक्रम थोड्या वेगळ्या पद्धतीने तयार केले गेले. काही ठिकाणी अडथळा शर्यतीचा वापर झाला तर काही ठिकाणी सापशिडीवर मुलींवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संदेश दिले गेले. आपली दैनंदिन कामे एका घडाळ्यामध्ये रंगवून मुले आणि मुली यांच्या आयुष्यातला जाणीवपूर्वक केला जाणारा भेदभाव मुलांच्या समोर आणला गेला. अशा अनेक खेळांनी मुलांना विचार करायला भाग पाडले आणि त्यांच्यात बदलही घडवूून आणले.
सर्वप्रथम झाली ती अडथळा शर्यत. ही शर्यत म्हणजे युनिसेफच्या सहाय्याने मीना राजू मंचच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या लिंग समभाव कार्यक्रमातील एक उपक्रम. सुरुवात अगदी निरुपद्रवी वाटली. कार्यकर्त्या ताईंनी जमिनीवर चार रेघा आखून चार स्पर्धकांसाठी जागा तयार केली. प्रत्येक लेनमध्ये त्यांनी रोजच्या वापरातील वस्तू ठेवल्या उदाहरणार्थ एक साडी, सुई-दोरा, हातोडा, खिळे, लाकडी फळी, फुटबॉल आणि लेस काढलेले बूट. त्या म्हणाल्या, “आज आपण एक शर्यत लावणार आहोत, पण साधी नाही. प्रत्येकाने सगळी कामे करायची, कोण काय करतं हे न पाहता.” दोन मुली आणि दोन मुलगे पुढे आले. मुलगे जरा चाचरत आपल्या लेनमध्ये उभे राहिले.
पहिल्या टप्प्यावर म्हणजे साडीची घडी घालणे अर्थातच मुले अडखळले. एकाने ती घोंगडीसारखी गुंडाळण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्याला काही टोकं जुळवून घडी घालायला जमेना. मुलींनी शांतपणे पुढे होऊन सराईतपणे घडी घालून दाखवली. मुली वेगाने पुढे सरकल्या तेव्हा मुले अजूनही तेच काम करत होते.
दुसऱ्या टप्प्यावर सुईत दोरा ओवणे आणि बटण शिवणे हे काम होतं. तिथेही मुली पुन्हा झटकन पुढे गेल्या. तिसऱ्या टप्प्यावर लाकडी फळीवर हातोड्याने खिळा ठोकणे. इथे मुली जरा संकोचल्या. पण त्यांनी ते काम पूर्ण केले. पुढे खरी गंमत होती कारण गोलाकार चपाती लाटायची होती. मुलींना इथे कोणी हरवूच शकत नव्हते.
मुलांनी ते काम संपवेपर्यंत मुली पुढच्या टप्प्यावर गेल्या होत्या. मुलांच्या चपात्या म्हणजे विविध देशांचे नकाशे झाले होते. मग आली बुटाची लेस बांधणे. इथे मुलांनी बरे केले, पण मुली आधीच पुढे गेल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात एका मुलीने फुटबॉलला लाथ मारली आणि सगळी कामे पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. तिच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
नंतर स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या उमा शितोळे ताईंनी सर्व मुलांना विचारले, “कोणती कामे सोपी होती? कोणती कठीण? का?” मुलांनी मान्य केले की साडी घडी, रोटी लाटणे यासारख्या घरकामांमध्ये ते कमकुवत होते. ती कामे नेहमीच बायकांची जबाबदारी मानली जातात असे त्यांना वाटत आले होते. पण खेळाने त्यांना विचार करायला लावले.
हा केवळ खेळ नव्हता. हा विद्यार्थ्यांना लिंग समभावाचे शिक्षण देण्यासाठी आखलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग होता. लिंगभेदाचे पूर्वग्रह उघड करण्यासाठी तो तयार करण्यात आला होता. “पुरुषांची” किंवा “महिलांची” म्हणून ठरवलेली कामे मिश्र गटांना देऊन हा उपक्रम हेच दाखवून देतो की, कामाला लिंग नसते, ते सरावाने येते.
दुसऱ्या एका खेळात विद्यार्थ्यांनी दिनक्रम दर्शवणारे “घड्याळ” रंगवले. त्यात त्यांनी रोजची घरकामे नोंदवली. त्यांना स्पष्ट फरक दिसला की, मुली चार-पाच तास घरकामात घालवतात आणि मुलगे एक तासापेक्षाही कमी. एका मुलाने हळूच सांगितले, “माझी बहीण पहाटे चारला उठून स्वयंपाक करते. मी सातला खेळायला उठतो.”
लिंग आणि जैविक लिंग यातील फरक समजावून सांगण्यासाठी एका खेळात मुलांना कागदावर मानवी शरीर काढून प्रत्येक अवयव ओळखण्यास सांगितले. सुरुवातीला लज्जेपोटी कोणीही जननेंद्रिये काढली नाहीत. उमा ताईंनी विचारले तेव्हा सारेजण ओशाळले. त्यांना जननेंद्रिये, प्रजनन संस्था, मासिक पाळी यांबद्दल समजावून सांगावे लागले. मानवी शरीराची कार्यपद्धती नीट कळण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. विरुद्ध लिंगाच्या विद्यार्थ्यांसमोर हा विषय एकत्र समजून घेणे मुलांसाठी खूप आव्हानात्मक होते. पण यामुळे अनेक गैरसमज दूर झाले, उमा ताई म्हणाल्या. त्यानंतर मात्र शरीराकृतींमध्ये जननेंद्रिय काढण्याबद्दल मुलांच्या मनातली भीती दूर झाली.
परस्पर संवाद किती महत्त्वाचा असतो हे मुलांना एका चर्चेच्या माध्यमातून कळून चुकले. विद्यार्थ्यांनी खऱ्या जीवनातील प्रसंगांवर चर्चा केली. पालकांचे वागणे, समाजाचे वागणे यावर अगदी कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी मोकळेपणाने आपले विचार मांडले. त्यातूनच लिंग भेदाची जाणीव अधिक तीव्रतेने पुढे आली आणि त्याविरोधात आवाज उठवण्याचीही. त्यामुळेच या बदलाच्या लहरी वर्गाच्या भिंतींपलीकडे पसरल्या. मुले आई, बहिणी आणि वर्गमित्रांना मदत करण्यासाठी पुढे येतात. मुली आपल्या हक्कांबद्दल बोलण्याचे धाडस करतात.
“या कार्यक्रमाने कधी उपदेश करण्याऐवजी समाजाला जोडून घेणे पसंत केले. विद्यार्थी, शिक्षक, कार्यकर्ते, कुटुंबे आणि अगदी संपूर्ण गावे सारेच लिंग समभाव समजून घेण्याच्या प्रवासात सामील झाले. खेळ, भूमिका अभिनय, कथाकथन आणि आत्मचिंतनाच्या माध्यमातून लिंग समभाव समजून घेणे आणि त्यानुसार छोटे छोटे बदल करणे हे मुलांनी, त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी, गावातील लोकांनी सुरू केले. या उपक्रमातील खेळ हे केवळ मनोरंजक नव्हते ते उद्देशपूर्ण होते. त्यांनी मुलांसाठी एक सुरक्षित व्यासपीठ तयार करून दिले. तिथे त्यांना मोकळे होण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी आणि वादग्रस्त विषयांवर आपली मते मांडण्यासाठी हक्काची जागा मिळाली. युनिसेफच्या शिक्षण तज्ज्ञ आणि लिंग समभाव कार्यक्रमाच्या प्रमुख रेश्मा अग्रवाल म्हणाल्या. खेळ हे केवळ मनोरंजनाचे नाही तर बदलाचेही माध्यम बनू शकतात हे या उपक्रमातून दिसून आले. खेळांनी केवळ मुलांना नाही तर शिक्षक, पालक, गावकरी सगळ्यांनाच एकत्र आणून लिंग समभावाच्या दिशेने पाऊल टाकायला भाग पाडले.
संकलन: श्रुति गणपत्ये, माध्यम सल्लागार, युनिसेफ महाराष्ट्र
छायाचित्र: फैसल मग्रे






