
बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन 'ॲक्शन मोड'वर! कॉपी केल्यास थेट जेल (Photo Credit- X)
बैठकीत शून्य सहनशीलता भूमिकेवर प्रशासन ठाम असून, महाराष्ट्र प्रतिबंधक गैरप्रवृत्ती अधिनियम, १९८२ तसेच मंडळाच्या शिक्षासूचनेनुसार दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यात कोणत्याही घटकाची गय केली जाणार नाही. गैरप्रकार करणाऱ्यांसोबतच त्यास मदत करणारे, दुर्लक्ष करणारे किंवा जाणीवपूर्वक डोळेझाक करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही समान स्वरूपाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे.
परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार, कॉपी अथवा मालप्रॅक्टिसेस कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. यावर्षी भरारी पथकामार्फत नव्याने टोकन पद्धतीने विद्यार्थ्यांची तपासणी परीक्षेदरम्यान करण्यात येणार आहे. अनुक्रमांक १ ते ५०, ५१ ते १०० अशा गटांनुसार टोकन देऊन दालननिहाय कसून तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान ज्या दालनात कॉपी अथवा गैरप्रकार आढळून येईल, त्या दालनातील परीक्षार्थी, संबंधित पर्यवेक्षक, केंद्रसंचालक तसेच बैठेपथक यांच्यावर
थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच बैठे पथक नियुक्त असतानाही गैरप्रकार झाल्यास, संबंधित पथकावरही कार्यवाही करण्यात येईल.
परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ कलमानुसार अनधिकृत जमाव, संशयास्पद हालचाली किंवा दबावतंत्र सहन केले जाणार नाही. जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष व परीक्षा वॉर रूम कार्यान्वित राहणार असून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर थेट देखरेख ठेवली जाणार आहे. संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेरे, विशेष भरारी पथके व नियमित बैठे पथके परीक्षा सुरू होण्यापासून संपेपर्यंत तैनात असणार आहेत. विशेष म्हणजे, २६ जानेवारी रोजी जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्तीची सामूहिक शपथ घेतली आहे. या परीक्षेत गैरप्रकार किंवा त्याकडे केलेली डोळेझाक माफ केली जाणार नाही. यासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारीने दक्षता घ्यावी, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी केले आहे.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हास्तरीय दक्षता समिती कार्यरत केली आहे. यात अध्यक्ष जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तर सदस्य म्हणून झेडपी सीईओ अंकित, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तरीत्या, लॉटरी पद्धतीने अचानक भेटी व तपासण्या घेण्यात येतील. परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स बंद असतील. पालकांसाठी परीक्षा केंद्राबाहेर पंडाल असतील. विद्यार्थ्यांना पाणी, वीज, पंखे, प्रकाश आदी सुविधा करण्याची जबाबदारी केंद्र संचालकांची असेल.
यावर्षी इयत्ता बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होत आहे. जिल्ह्यातील १५९ परीक्षा केंद्रांवर एकूण ६५ हजार ५१६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यापैकी ७ परीक्षा केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून, या सर्व केंद्रांवरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक व संपूर्ण परीक्षा कर्मचारी यांची अदलाबदल करून पूर्णपणे नवीन स्टाफ नियुक्त करण्यात येणार आहे. या केंद्रांवर प्रशासनाची विशेष करडी नजर राहणार आहे.
सर्व परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक दालनात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असणे बंधनकारक आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर काही दालनांमध्ये सीसीटीव्ही असून काही दालनांमध्ये नाहीत, अशा परिस्थितीत त्या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ तात्काळ बदलण्यात येणार आहे, तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून त्या केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार आहे, यावर्षी निवडक १०० परीक्षा केंद्रांवर पूर्ण वेळ व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असून, इतर सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज परीक्षा संपल्यानंतर पेन ड्राइव्हद्वारे केंद्र संचालकांकडून जमा करण्यात येणार आहे.
परीक्षेविना सरकारी नोकरीची संधी! ‘या’ बँकेत भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर