फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IIT Madras: भारतातील प्रमुख तंत्रज्ञान संस्था ‘आयआयटी मद्रास’ आणि इंडोनेशियाचे उच्च शिक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. आता ही संस्था जागतिक पातळीवर आपली संशोधन आणि नावीन्यपूर्ण क्षमता आणखी मजबूत करणार आहे.
या करारानुसार भारत आणि इंडोनेशिया एकत्र काम करून एक मजबूत संशोधन आणि नावीन्यपूर्ण इकोसिस्टम तयार करतील. याच्या माध्यमातून दोन्ही देशांचे विद्यापीठे, संशोधक, विद्यार्थी आणि स्टार्टअप्स संयुक्त प्रकल्पांवर काम करू शकतील. तसेच, डीप टेक्नॉलॉजीला बाजारापर्यंत पोहोचवण्यावर आणि नवीन तंत्रज्ञानाला उद्योगांशी जोडण्यावर भर दिला जाईल.
इंडोनेशियाचे उच्च शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री प्रो. ब्रायन युलियार्तो यांचे म्हणणे आहे की, त्यांचा देश एक नावीन्य-आधारित जागतिक अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय समोर ठेवून वाटचाल करत आहे. यासाठी जागतिक दर्जाच्या संस्थांसोबत सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यांनी पुढे सांगितले की, या करारानंतर इंडोनेशियाच्या विद्यापीठांना संयुक्त संशोधन, विद्यार्थी आणि संशोधक प्रशिक्षण, तंत्रज्ञानाचे व्यावसायिकरण आणि नावीन्यपूर्ण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याची अधिक संधी मिळेल. त्यांचे ध्येय केवळ संशोधन करणे हे नसून, नवीन विचारांचे यशस्वी स्टार्टअप्स आणि जागतिक उद्योगांमध्ये रूपांतर करणे हे आहे.
आयआयटी मद्रासचे संचालक आणि ‘आयआयटी मद्रास ग्लोबल रिसर्च फाऊंडेशन’चे चेअरमन प्रो. व्ही. कामकोटी यांनी सांगितले की, हा करार आयआयटी मद्रासच्या जागतिक संशोधन आणि नावीन्यपूर्ण क्षमतेवर जगाचा असलेला विश्वास दर्शवतो. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ‘आयआयटीएम ग्लोबल’च्या माध्यमातून संस्था आपली क्षमता आंतरराष्ट्रीय स्तरावर सामायिक करत आहे, ज्यामुळे वास्तविक समस्यांवर प्रभावी उपाय विकसित करता येऊ शकतात.
नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात झालेल्या द्विपक्षीय वार्तानंतर ही भागीदारी समोर आली आहे. त्यादरम्यान दोन्ही नेत्यांनी उच्च शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, नावीन्य आणि उद्योजकता या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. या करारामुळे केवळ भारत आणि इंडोनेशियामध्येच नव्हे, तर ‘दक्षिण-दक्षिण सहकार्याचा’ एक यशस्वी पॅटर्न तयार होण्याची अपेक्षा आहे.






