फोटो सौजन्य- सोशल मीडिया
High Salary Trap: आजच्या काळात बहुतांश तरुण वर्किंग प्रोफेशनल्ससाठी जास्तीत जास्त पगार मिळवणे हेच मुख्य ध्येय असते. परंतु, एका एमबीए (MBA) प्रोफेश्नलने यावर प्रश्न उपस्थित केला आहे. जास्त कमाई करण्याची किंमत, त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा अधिक होऊ शकते का? असा एक टप्पा आयुष्यात येतो का?
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका रीलमध्ये एमबीए ग्रॅज्युएट मोहित तलरेजा यांनी असा सल्ला दिला आहे की, शहरांमध्ये काम करणाऱ्या प्रोफेशनल्सनी अथांग पगाराच्या मागे धावण्याऐवजी दरमहा १.५ लाख ते २ लाख रुपये कमाईला आपली ‘वैयक्तिक आर्थिक सीमा’ मानले पाहिजे. त्यांनी जास्तीत जास्त पगाराच्या मागे धावण्याच्या या शर्यतीला एक ‘ट्रॅप’ म्हटले आहे.
मोहित तलरेजा यांच्या मते, शहरी प्रोफेशनल्सनी लवकरात लवकर एका ठराविक पगाराच्या पातळीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारतात जर तुम्ही महिन्याला दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचत असाल, तर हा तुमचा बेंचमार्क असायला हवा. अर्थात, लोक आपापल्या परिस्थितीनुसार हा बेंचमार्क स्वतः ठरवू शकतात.
त्यांनी पुढे सांगितले की, तुम्ही जितक्या जास्त पगाराच्या मागे धावता आणि जितके वर जाऊ इच्छिता, तितक्याच जास्त गोष्टींचा तुम्हाला त्याग करावा लागतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील इतर महत्त्वाच्या घटकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो.
तलरेजा यांचा सल्ला आहे की, करिअरच्या सुरुवातीला भरपूर कष्ट करा, एक आर्थिक सुरक्षेची पातळी गाठा आणि त्यानंतर करिअरमधील प्रगतीची प्रक्रिया सुरू ठेवा. पण यालाच आयुष्याचे एकमेव प्राधान्य बनवू नका.
त्यांचा इशारा आरोग्य, कुटुंब आणि नवनवीन गोष्टी शिकणे यांसारख्या घटकांकडे होता. जेव्हा तुम्ही यश किंवा प्रगतीचा एकमेव निकष हा पगार आणि कामालाच बनवता, तेव्हा या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मागे पडू लागतात.
आपला वेळ विकून सतत पैसे कमावणे, जास्त पगाराच्या मागे धावणे किंवा रात्रंदिवस मेहनत करून दुसऱ्या कोणालातरी श्रीमंत बनवणे… या मार्गाने कदाचित दीर्घकालीन समाधान मिळणार नाही. त्याऐवजी, त्या वेळेतील काही भाग स्वतः काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा उत्पन्नाचा दुसरा मार्ग निर्माण करण्यासाठी वापरला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.






