फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Jawahar Balbhavan Ganeshotsav : जवाहर बालभवनमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कला, सृजनशीलता आणि नवोन्मेषी विचारांना चालना मिळते. हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले.
महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक आणि सर्जनशील उपक्रमांना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल तसेच शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे नुकतेच कौतुक केले.
विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळावा तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनतर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘गणेश मूर्ती कृतिसत्र’, ‘वेशभूषा स्पर्धा’ आणि ‘गणेश मूर्ती बनविणे स्पर्धा’ अशा विविध उपक्रमांचे २ ते ९ सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणेश मूर्ती कृतिसत्र आयोजित करण्यात आले असून, इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पौराणिक वेशभूषेवर आधारित वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण, संस्कृती आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धाही आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तसेच विविध कलाकृतींची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि कौशल्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि भारतीय संस्कृतीबाबतची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या
महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन ही संस्था ४ ते १६ वर्षे वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ठरत असल्याची माहिती बालभवनच्या संचालक नीता पाटील यांनी यावेळी दिली.






