
Latur Municipal School News
मिळालेल्या माहितीनुसार, सीजेपीचे (CJP) राज्यासह संपूर्ण देशभरात स्कूल ठिक करो अभियान सुरू आहे. या अभियानादरम्यान अभिजीत दिपके यांनी अण्णाभाऊ साठे या शाळेला भेट देत तेथील शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी केली. या पाहणीवेळी विद्यार्थ्यांना अद्यापही बेंच नसून ते जमिनीवर बसूनच शिक्षण घेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांनी संवाद साधताना शाळेतील पाण्यापासून शौचालयांच्या सुविधांबाबत प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांनी ही शाळाच आपली नसल्याचे सांगितले, असा दावा अभिजीत दिपके यांनी केला.
शाळाभेटीदरम्यान दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी या शाळेत आणून बसण्याचा प्रकार लक्षात येताच दिपके यांनी तातडीने महापालिका उपायुक्त वसुधा फड यांच्याशी संपर्क साधला. अभिजीत दिपके यांनी वसुधा फड यांनी संबंधित शाळेतील सर्व परिस्थिती सांगितली आणि या परिस्थितीची चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
” आम्ही पाहणीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाहेरच्या शाळेतील विद्यार्थी इथे आणण्यात आले. स्वत:च्या चुका लपवण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. शाळेत फक्त दोन वर्ग आणि दोनच शिक्षक आहेत. शिवाय शाळेत मूलभूत सुविधांचेही प्रश्न आहेत, या सर्व गोष्टींकडे त्यांनी लक्ष वेधत स्थानिक महापालिका प्रशासनाकडे शाळेची स्थितीत तातडीने सुधारण्यात यावी, अशी मागणी केली.
याशिवाय, शाळेत डमी विद्यार्थी बसवल्याच्या आरोपाची चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, तसेच शाळेतील आवश्यक सुविधांकडेही लक्ष दिले जाईल, असे आश्वासन यावेळी उपायुक्त वसुधा फड यांनी दिपके यांना दिले. या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत नेमके काय समोर येते आणि त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.
राज्यातील सरकारी शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करत अभिजीत दिपके यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. “आमदार फोडण्यापेक्षा शाळा सुधारा,” असा टोला त्यांनी सरकारला लगावला.
सरकारी आणि महापालिका शाळांमधील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी दिपके यांनी केली. राजकीय घडामोडींवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. त्याऐवजी हा निधी सरकारी शाळांच्या सुविधा सुधारण्यासाठी वापरल्यास गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाची संधी मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.