
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या शाळांच्या दुरवस्थेबाबत आमदार रईस शेख यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी शाळांच्या सुधारणेसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
मंत्री भुसे म्हणाले की, “शाळांमधील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. जर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेने मागणी केली, तर त्यांना नववी आणि दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची तसेच आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करण्याची परवानगी शासन स्तरावरून तात्काळ दिली जाईल.” तसेच शिक्षण क्षेत्रात अधिक गुंतवणूक होणे गरजेचे असून, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अतिरिक्त निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
या चर्चेदरम्यान राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या शाळांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सद्यस्थितीत महानगरपालिकामार्फत ८६ प्राथमिक आणि ११ माध्यमिक अशा एकूण ९७ शाळा चालवल्या जातात. यापूर्वी या शाळा ५१ इमारतींमध्ये भरत होत्या. मात्र, त्यातील ५ इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्याने त्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत उर्वरित ४६ इमारतींमध्ये सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत शाळा भरवल्या जात आहेत. त्यानंतर या परिस्थितीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळांचे ऑडिट होणार आहे.
धोकादायक ठरलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. शाळांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, अनेक कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. यासोबतच, महानगरपालिकांनी त्यांच्या बजेटमध्ये शिक्षणासाठी स्वतंत्र निधी राखून ठेवावा, याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा विचार सरकार करत असल्याचेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.