
शैक्षणिक वर्ष सुरू, पण अनधिकृत शाळांची माहिती अद्याप नाही; विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता
दरवर्षी महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका आणि शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली जाते. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांच्या शिक्षणाबाबत योग्य निर्णय घेण्यास मदत होते. तसेच अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेण्यापासून विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे संरक्षण होते.
मात्र, मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून अद्याप अशी कोणतीही यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश घेतल्यानंतर जर संबंधित शाळा अनधिकृत असल्याचे पुढे समोर आले, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
मनविसे आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर अनेक महिने उलटल्यानंतर अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात काहीही अर्थ नाही. त्यावेळी विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झालेले असतात आणि पालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर संघटनांनी शिक्षण विभागाला निवेदन देत तातडीने अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच, लवकरात लवकर यादी प्रसिद्ध न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. शहरातील हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा प्रश्न असल्याने महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी पालक आणि विविध संघटनांकडून केली जात आहे.