
फोटो सौजन्य - Social Media
नीता परब, मुंबई : बारावी परीक्षेच्या निकालात मुंबई विभागाचा यंदा एकूण निकाल ९०.०८ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत २.८५ टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीही राज्याच्या क्रमवारीत मुंबई विभागाने सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. एकूण निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली असून त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.२५ तर मुलांची ८७.९९ टक्के नोंदवली गेली आहे.
यंदा मुंबई विभागातून ३ लाख २४ हजार ७३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३ लाख २३ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २ लाख ९१ हजार ४१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या कामगिरीत मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा निकाल ९५.६४ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत केवळ ०.६९ टक्क्यांची किरकोळ घट झाली आहे. या शाखेत मुलींची उत्तीर्णता ९६.४० टक्के असून मुलांची ९४.९७ टक्के आहे. वाणिज्य शाखेत मात्र मोठी घसरण दिसून आली असून निकाल ५.६१ टक्क्यांनी कमी झाला आहे. १ लाख ५६ हजार ९०० विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३६ हजार ४७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दुसरीकडे कला शाखेच्या निकालात किंचित सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षी ८४.६३ टक्के असलेला निकाल यंदा ०.५६ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे कला शाखेतील विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक मानली जात आहे. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत मुंबई विभागाचा निकाल चढ-उतार अनुभवत आहे. २०२३ मध्ये ८८.१३ टक्के, २०२४ मध्ये ९१.९५ टक्के, २०२५ मध्ये ९२.९३ टक्के आणि यंदा ९०.०८ टक्के असा प्रवास राहिला आहे. निकालाच्या श्रेणीमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून ३९,०८९ विद्यार्थ्यांनी प्राविण्यसह प्रथम श्रेणी मिळवली आहे, तर ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे ८१,९१६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ४५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे १,२६,५६० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ३५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे ४३,९१० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.