
मनपा शाळेत 'वॉटर बेल', उन्हाच्या तडाख्यापासून विद्यार्थ्यांचे होणार संरक्षण
केवळ विद्यार्थ्यांच्याच नव्हे, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रत्येकाने स्वतःची पाण्याची बाटली शाळेत सोबत बाळगावी आणि वेळोवेळी पाणी प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थ्यांना पुरेसे पाणी पिण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देशही शिक्षकांना देण्यात आले आहेत.
गेल्या काही दवसांपासून वातावरणात कमालीचा बदल होत आहे, कधी गारवा, कधी ढगाळ वातावरण तर कधी एकदम कडक उन्हाचा तडाखा यामुळे वद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती असल्याने पालकांनीही काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशसानाने केले आहे.
सध्या कडाक्याच्या उन्हामुळे निर्जलीकरण (डिहायड्रेशन), थकवा, चक्कर येणे यांसारख्या तक्रारी विद्यार्थ्यांमध्ये वाढण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी शाळांमध्ये दर दोन तासिकांनंतर एक विशेष घंटा वाजवली जाईल. ही घंटा वाजताच सर्व विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून दिली जाईल. या निर्णयाबाबत शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी अधिकृत आदेश जारी केले आहेत. या उपक्रमाची शाळांमध्ये काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
‘वॉटर बेल’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर पाणी पिण्याची सवय लागेल आणि उष्माघातासारख्या त्रासांपासून त्यांचे संरक्षण होईल, सर्व शाळांनी या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे,अशी प्रतिक्रिया मनपा शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी दिली.
उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेने शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत ठराविक वेळाने घंटा वाजवली जाते आणि त्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित केले जाते.
अनेकदा खेळ, अभ्यास किंवा इतर उपक्रमांमध्ये गुंतल्यामुळे लहान मुले पाणी पिणे विसरतात. त्यामुळे डिहायड्रेशन, थकवा आणि उष्माघाताचा धोका वाढतो. ‘वॉटर बेल’मुळे विद्यार्थ्यांना वेळोवेळी पाणी पिण्याची सवय लागणार असून त्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. शाळांमध्ये शिक्षकांनाही या उपक्रमाची जबाबदारी देण्यात आली आहे. घंटा वाजल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने पाणी पिले आहे का, याची खात्री केली जाते. काही शाळांमध्ये पाण्याची स्वच्छता आणि उपलब्धता याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.
हा उपक्रम केवळ उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या आरोग्याच्या सवयी विकसित करण्यासाठीही महत्त्वाचा ठरत आहे. पालकांकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, इतर शहरांनीही अशीच पद्धत अवलंबावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.