
'गणित गुरुवार'नंतर आता 'सायन्स सोमवार'; महापालिका शाळांमध्ये नवा शैक्षणिक उपक्रम
महानगरपालिका शिक्षण विभाग व खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वरळीतील नेहरू विज्ञान केंद्रात मिशन मेरिट आणि स्टेम सुधार उपक्रम अंतर्गत आयोजित बैठक व गुणगौरव समारंभात महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, शिक्षण समिती सदस्य वर्षा टेंबुलकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, खान अकॅडमी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती वासुदेवन, शेल इंडिया अपस्ट्रीमचे महाव्यवस्थापक निपूण प्रधान, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरीतकुडवे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक वाराला वेगळा विषय घ्या – शिरवडकर
शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर म्हणाल्या, शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच गणित गुरुवार सारखे उपक्रम राबविल्यामुळे महानगरपालिकेच्या शाळांनी खासगी शाळांना मागे टाकले आहे. विद्याथ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत शिक्षकांसह पालकांचाही तितकाच वाटा आहे. गणित गुरुवार, सायन्स सोमवारप्रमाणे आठवड्याच्या प्रत्येक वाराला वेगळा विषय घ्यावा, असेही त्यांनी सुचविले.
शालेय अभ्यासासाठी उपलब्ध करून देणार लॅपटॉप
‘गणित गुरुवार’ या उपक्रमात दर गुरुवारी रात्री ८ ते १० या वेळेत जेव्हा मुले स्वत हुन मोबाईल किंवा टेंब घेऊन गणिताचा सरावाला बसतात, तेव्हा पालकांनाही अभ्यासाचे महत्व पटू लागते. गणितापाठोपाठ आता या शैक्षणिक वर्षापासून ‘सायन्स सोमवार’ हा नवा उपक्रम सुरू होत आहे. ‘गुरुवारी गणिताशी मैत्री, सोमवारी विज्ञानाचा चमत्कार’, असा दुहेरी आनंद आता महानगरपालिकेच्या शाळांतील मुलं घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. सोमवारी विज्ञान आणि गुरुवारी गणित या समीकरणामुळे श्रीनिवास रामानुजन, डॉक्टर होमी भाभा किवा डॉक्टर जयंत नारळीकर याच महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांमधून घडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच १५० गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासाठी लॅपटॉप देणार असल्याचेही यावेळी तावडे यांनी सांगितले.
मुख्याध्यापकांसह शिक्षकांचा पालिकेकडून गौरव
यावेळी गणित गुरुवार उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १३३ शाळांचा आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, मुख्याध्यापकांचा, शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. महापौर रितू तावडे म्हणाल्या, ‘मिशन मेरिट आणि स्टेम सुधारणा कार्यक्रम’च्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. ज्या ९३० हून अधिक शाळांमध्ये हा स्टेम कार्यक्रम राबवला गेला, त्या शाळातील मुले खान अकॅडमीच्या माध्यमातून डिजिटल स्क्रीनवर गणित आणि विज्ञानाचे अवघड प्रश्न चुटकीसरशी सोडवतात. सुमारे सव्वा लाख विद्यार्थी या उपक्रमामुळे आधुनिक शिक्षण प्रवाहात आले आहेत. तब्बल ३१ हजार विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान विषयात मिळवलेले अतिरिक्त प्राविण्य हे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे यश आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)