फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील सुमारे दोन लाख आयटीआय विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, यासाठी अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (कौशल्य विभाग) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे तांत्रिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देत प्रत्यक्ष आपत्तीच्या प्रसंगी काम करण्याचे कौशल्य प्राप्त होणार आहे.
मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले की, आपत्ती ही कधीही आणि कुठेही उद्भवू शकते. ती नैसर्गिक असो—जसे पूर, भूकंप, चक्रीवादळ—किंवा मानवनिर्मित असो, अशा वेळी तत्काळ आणि शिस्तबद्ध प्रतिसाद देणारी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते. युवकांमध्ये ऊर्जा, धाडस आणि कार्यक्षमता असते. योग्य प्रशिक्षण दिल्यास हेच युवक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला प्रभावी सहकार्य करू शकतात. जनसेवेच्या भावनेतून देशसेवेसाठी सज्ज असलेली युवा पिढी तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अकॅडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांनी सांगितले की, राज्यातील ४१९ शासकीय आयटीआयमध्ये हे प्रशिक्षण विनाशुल्क दिले जाणार आहे. प्रशिक्षणात प्रात्यक्षिकांना विशेष महत्त्व दिले जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीत काम करण्याचा अनुभव मिळेल. शहरी आणि ग्रामीण भागातील विविध प्रकारच्या आपत्तींचा अभ्यास करून अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. प्राथमिक उपचार, बचावकार्य, आपत्कालीन प्रतिसाद, सुरक्षित स्थलांतर, अग्निशमन उपाययोजना आणि समन्वय कौशल्ये यांचा समावेश प्रशिक्षणात असेल.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी नमूद केले की, तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच आपत्तींचे स्वरूपही बदलत आहे. त्यामुळे आधुनिक आणि प्रभावी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण नव्या पिढीसाठी अत्यावश्यक आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना आणि सामाजिक बांधिलकी विकसित होईल.
या सामंजस्य करारामुळे आयटीआय विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्यांसोबतच मानवी मूल्यांची जोड मिळणार आहे. आपत्तीच्या प्रसंगी तत्परतेने मदत करणारी, प्रशिक्षित आणि सजग युवा पिढी घडविण्याकडे हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.






