
फोटो सौजन्य - Social Media
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील काकडवाल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ‘मिशन भरारी’ उपक्रमांतर्गत घेतलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यात अव्वल स्थान पटकावले आहे. या यशामुळे शाळेच्या तीन विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे शैक्षणिक सहल आणि अभ्यास दौऱ्यासाठी प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. सरकारी शाळांच्या गुणवत्तेबाबत नवा आदर्श निर्माण करणारे हे यश ठाणे जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अंकित मढवी (इयत्ता ५ वी), चैत्रवी साळवी (इयत्ता ७ वी) आणि दक्ष भाने (इयत्ता ७ वी) यांचा समावेश आहे. या तिघांनीही तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत शाळेचा लौकिक उंचावला आहे. केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी सातत्यपूर्ण गुणवत्तेचे प्रदर्शन करत यश मिळवले.
या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. इयत्ता पाचवीचे वर्गशिक्षक सोमनाथ दंडगव्हाळ आणि सातवीच्या वर्गशिक्षिका सुजाता सपकाळ यांनी विद्यार्थ्यांच्या संकल्पना भक्कम करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. तसेच अजय जाधव यांनी अतिरिक्त तासिका घेत विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवले.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी आधुनिक डिजिटल साधनांचा वापर केला. गुगल जेमिनी एआय सारख्या तंत्रज्ञानाचा अभ्यासात समावेश केल्यामुळे त्यांना विषय समजून घेणे अधिक सोपे झाले. त्यामुळे त्यांच्या यशात तंत्रज्ञानाचीही मोठी भूमिका असल्याचे दिसून येते.
शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री नाडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकवर्ग, स्वयंसेविका आणि संस्थेच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य झाला आहे. शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि स्थानिक समाजघटकांनी दिलेल्या पाठबळामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल अधिक बळकट झाले.
जिल्हा परिषद शाळेने खासगी शाळांना मागे टाकत मिळवलेले हे यश ठाणे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. ‘मिशन भरारी’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि शिक्षक-विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले असून, भविष्यात अशाच यशस्वी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.