
येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्...
पुणे : खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी येरवडा खुल्या जिल्हा कारागृहातून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा कारागृहातील शेतीत सापडलेल्या मोबाईलच्या चौकशीच्या भीतीने तो पळाल्याची प्राथमिक माहिती आहे. संतोष लक्ष्मण भिंगारे (मुळ रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे कारागृहातून पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी तुरुंगाधिकारी श्रेणी २ नागनाथ महादेव भानवसे (वय ५५, रा. मांजरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना 8 मे रोजी दुपारी दीड ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, भिंगारे याला साताऱ्यातील भुईज पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हा कैदी कोल्हापूर खुल्या जिल्हा कारागृहातून १९ ऑक्टोबर २०२५ पासून येरवड्यातील जिल्हा खुल्या कारागृहात वर्ग करण्यात आला होता. त्याला केशकर्तनालयात काम देण्यात आले होते. दरम्यान अधिक्षकांसह वरिष्ठ तुरुंगाधिकारी हे ८ मे रोजी कारागृहाच्या शेती विभागाची पाहणी करत होते. तेव्हा तुती बागेतजवळ बेवारस, सिमकार्ड नसलेला मोबाईल आढळून आला.
या मोबाईलसंदर्भात भिंगारेसह दुसऱ्या एका कैद्याची चौकशी केली जाणार होती. दरम्यान, घटनेच्या दिवशी तो सायंकाळच्या जेवणानंतर येतो” असे सांगून बराकीकडे गेला. मात्र चौकशीसाठी पुन्हा बोलावले असता तो बराकीत आढळून आला नाही. कारागृहातील शेती व परिसरात शोध घेतला असता भिंगारे सापडला नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सत्रे करत आहेत.
धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून
आंबेगाव पठार परिसरात अनैतिक संबंधातून एका तरुणाचा डोक्यात लाकडी पाट तसेच धारधार हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. दरम्यान, दोघांनी या तरुणाचा खून केला असून, दोघेही पसार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली. दिपक क्षीरसागर वय (३८, रा. आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिपक याच्या बहिणीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.