
पैठण तालुक्यात भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू
पैठण : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटना वाढल्या असून, दररोज अपघातामध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पैठण तालुक्यातील विहामांडवा-चौंडाळा मार्गावरील सहकारी साखर रेणुकादेवी-शरद कारखान्यासमोर रविवारी (२१ जून) रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पारधी कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
साखर रेणुकादेवी-शरद सहकारी कारखान्याच्या मागील बाजूस वास्तव्यास असलेल्या पारधी कुटुंबातील पाच जण दोन मोटारसायकलींवरून प्रवास करत होते. यावेळी समोरून येणाऱ्या पिकअप (क्र. एमएच १७. के. ९०७७) लोडिंग वाहनाची मोटारसायकलशी समोरासमोर जोरदार धडक झाली. भरधाव पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सिद्धार्थ भैय्या चव्हाण (वय ३०), पायल सिद्धार्थ चव्हाण (वय २७), आव्हान्या सिद्धार्थ चव्हाण (वय ५), संजना अभिषेक चव्हाण (वय २२) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पारधी समाजातील मोठ्या संख्येने लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक हरी बोबडे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने पाचोड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण आणि पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पारधी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
रविवारी रात्रीच्या या भीषण अपघाताने पारधी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आनंदाने सुरू असलेला प्रवास काही क्षणांतच मृत्यूच्या दारात पोहोचला. चौघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
एकाच कुटुंबातील चौघे ठार
भरधाव पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सिद्धार्थ भैय्या चव्हाण (वय ३०), पायल सिद्धार्थ चव्हाण (वय २७), आव्हान्या सिद्धार्थ चव्हाण (वय ५), संजना अभिषेक चव्हाण (वय २२) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.