
देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू
कवठेमहांकाळ : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज अनेक जणांना अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता एक मोठी घटना समोर आली आहे. रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कोल्हापूर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेसात ते पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृतांमध्ये कोल्हापूर जिल्हा न्यायालयातील वकील वंदना संतोष गायकवाड (वय ३८) आणि त्यांचे पती संतोष धोंडीराम गायकवाड (वय ४५, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड दाम्पत्य त्यांच्या MH-09-FJ-2815 क्रमांकाच्या व्हॅगनार कारने कोल्हापूरहून पंढरपूरकडे अक्कलकोट येथे देवदर्शनाला जात होते. शिरढोण गावाजवळील नायरा पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर (MH-09-CJ-2671) व त्याच्या दोन ट्रॉलींना त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ट्रॅक्टर चालक व कामगार चहा पिण्यासाठी जवळील हॉटेलमध्ये थांबले होते. धडक अत्यंत भीषण असल्याने कार ट्रॉलीखाली अडकली आणि कारमधील दोघांचा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने यांचे स्विय सहाय्यक अमोल कोरे यांच्या तत्परतेमुळे मृतांची ओळख पटविणे शक्य झाले असून, अमोल कोरे यांनी तत्काळ संपर्क साधल्याने पोलिसांना मोठी मदत मिळाली.
हे सुद्धा वाचा : नगरसेवक करणार ‘ड्रग्ज मुक्त प्रभाग’! पुणे पोलीस आयुक्तांचा महत्वकांक्षी उपक्रम
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस हद्दीत बारामती फाट्याजवळ शुक्रवारी (दि. २०) पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अक्कलकोटहून पुण्याकडे जाणारी एसटी बस पलटी होऊन अपघात झाला आहे. या भीषण अपघातात बसमधील सुमारे ४४ प्रवासी थोडक्यात बचावले असून तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. या बसमध्ये अंदाजे ४४ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.