
NEET पुनर्परीक्षेआधीच आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या; 2 दिवसात 4 विद्यार्थ्यांनी संपवले जीवन
अहमदाबाद : २१ जून रोजी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेच्या ३ दिवस आधी अहमदाबादच्या न्यू राणीप परिसरातील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून एका नीट विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, पीडित विद्यार्थ्यांचे कुटुंब धक्क्यात आहे. मृत विद्यार्थ्यांची ओळख १८ वर्षीय कहान पटेल अशी पटली आहे. पोलिसांचे एक पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमी मुलाला स्थानिक रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृत विद्यार्थ्याच्या मामांनी पोलिसांना सांगितले की, त्याची पहिली नीट परीक्षा खूप चांगली झाली होती आणि तो फेरपरीक्षेची तयारी करत होता. त्यांनी कोणत्याही दबावाचा उल्लेख केला नाही. कहानने गुरुवारी सकाळी अरिस्टो आनंदम फ्लॅट्सच्या सर्वांत वरच्या मजल्यावरून उडी मारली. मोठा आवाज आणि किंकाळ्या ऐकून सोसायटीचे सदस्य आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत कहानचा मृत्यू झाला होता. घटनेची भीषणता पाहून स्थानिक रहिवाशांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच, साबरमती पोलिसांचे एक पथक त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
गेल्या दोन दिवसांतील नीट विद्यार्थ्याच्या आत्महत्येची ही चौथी घटना आहे. कोईम्बतूरमध्ये नीटची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनी अनुकीर्तनाने बुधवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. १६ जूनला डेहराडूनमध्ये २३ वर्षीय रिया थापा आणि लखनौमध्ये १७ वर्षीय एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. १२ मे रोजी नीट परीक्षा रद्द झाल्यापासून देशभरात आतापर्यंत सुमारे १२ विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले आहे.
विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
गेल्या काही दिवसाखील आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथे एका २४ वर्षीय विवाहित महिलेने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मयत मुलीच्या आईने तिच्या पतीविरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रेरणा शुभम तांबडे या विवाहितेचा विवाह ३० एप्रिल २०२५ रोजी शुभम बाबुराव तांबडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याच कारणावरून पत्नीला वारंवार शिवीगाळ, दमदाटी आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचाही दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.