वेदांत बंडगर खूनप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी; सोमवारपासून हमाल-माथाडी कामगारांचा संप
यासंदर्भात मुख्यमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक यांच्याकडेही निवेदन देऊन स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला हमाल नेते विकास मगदूम, रामचंद्र बंडगर, खंडू सोनू, बाळासाहेब बंडगर, मारुती बंडगर, पृथ्वीराज पवार आणि बजरंग मोहिते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना पदाधिकाऱ्यांनी वेदांत बंडगर हत्येपूर्वी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ९ जूनपासून सुरू झालेल्या वादानंतर १० जून रोजी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या बंडगर कुटुंबीयांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. उलट पोलीस ठाण्यातच धमक्या दिल्या जात असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले. निलेश गडदे यांच्याकडून धमक्या दिल्या जात असताना कोळेकर घटनास्थळी उपस्थित होते. मात्र त्यांनी कारवाई करण्याऐवजी बंडगर कुटुंबीयांनाच अपमानास्पद वागणूक दिली. तक्रार तत्काळ नोंदवून घेतली नाही. या काळात त्यांना येणारे दूरध्वनी आणि काही राजकीय नेत्यांशी झालेल्या संभाषणांची चौकशी व्हावी. या प्रकरणामागे कार्यरत असलेल्या ‘राजकीय अदृश्य शक्ती’चा शोध घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.संदीप कोळेकर यांचे निलंबन करून त्यांची चौकशी करावी, यापूर्वी देखील त्यांनी काही प्रकरणात असंवेदनशीलपणा दाखवला आहे, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी पृथ्वीराज पवार यांनी केली.
पोलीस ठाण्यात निलेश गडदे व त्यांच्या समर्थकांकडून उघडपणे धमक्या दिल्या जात होत्या. त्यावेळी बाळासाहेब बंडगर यांना दूरध्वनीवरूनही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना असूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच आतापर्यंत पोलीस खात्याकडून केवळ औपचारिकता पार पाडली आहे.
वेदांत बंडगर हत्येतील सर्व संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, तपासातील प्रत्येक संशयित भूमिकेची चौकशी करावी आणि संपूर्ण प्रकरण एसआयटीकडे सोपवावे, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारपासून आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनांच्या वतीने जाहीर करण्यात आले.
या प्रकरणातील मूळ कारण आरग रेल्वे मालधक्का परिसरातील हमालीच्या कामावरील नियंत्रण असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. लक्ष्मण खरात हा मुकादम असून जी. व्ही. आलोलकर या आस्थापनेच्या वतीने तेथे हमालीचे काम चालते. या ठिकाणी सुमारे १०४ माथाडी व हमाल कामगार कार्यरत आहेत. या हमालीवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नातूनच संपूर्ण संघर्ष निर्माण झाला आणि त्यातून वेदांत बंडगर या निष्पाप मुलाचा बळी गेला, असा आरोप करण्यात आला.
या घटनेमुळे असंघटित कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “आज वेदांत गेला, उद्या कोण?” असा सवाल उपस्थित करत कामगारांमध्ये तीव्र असंतोष असल्याचे विकास मगदूम यांनी सांगितले.






