संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज खून, हाणामाऱ्या, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा येथे घडली आहे. तरुणीचा खून करुन पसार झालेल्या आरोपी तरुणाला आंबेगाव पोलिसांनी अटक केली.
मनीषा खम्म दमाई (वय २५, सध्या रा. आयुषी काॅम्प्लेक्स, पारी कंपनी चौक, नऱ्हे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश अर्जुन तिखात्री (वय ३०, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. ढकारी, जि. आछम, नेपाळ) याला अटक केली आहे. याबाबत किशन भरत परिहार (वय ३५, सध्या रा. ओमशांती बिल्डिंग, मानाजीनगर, नऱ्हे, मूळ रा. जि. वाडा, नेपाळ ) याने आंबेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रार किशन परिहार याची मनीषा दमाई बहीण आहे. मनीषा हिचे आरोपी किशन परिहार याच्याशी प्रेमसंबंध होते. मनीषा आणि आरोपी किशन हे मूळचे नेपाळचे आहेत. ते रखवालदार म्हणून काम करतात. मनीषाचे किशनशी प्रेमसंबंध होते. आरोपी किशन हा काही कामधंदे करत नव्हता. त्यामुळे मनीषाने त्याच्याशी असलेले प्रेमसंबध तोडले. प्रेमसंबंध तोडल्यानंतर आरोपी तिच्यावर चिडला होता.
१८ मार्च रोजी किशन हा मनीषाला नऱ्हे भागात भेटायला आला. त्याने गोड बोलून मनीषाला मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ नेले. तेथील एका हॉटेलच्या परिसरात मागील बाजूस दाट झाडी आहे. दाट झाडीत त्याने मनीषाला नेले. तेथे त्याने तिच्याशी वाद घातला. वादानंतर दोरीने गळा आवळून तिचा खून करुन तो पसार झाला. दरम्यान, दाट झाडीत एका तरुणी मृतावस्थेत सापडल्याचे उघडकीस आल्यानंतर परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली.
आंबेगाव पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन चोरमले, सहायक निरीक्षक मुलाणी यांनी तातडीने तपास सुरू केला. मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीची ओळख पटविली. तपासात मिळालेल्या माहितीनंतर आरोपी किशनला ताब्यात घेण्यात आले. प्रेमसंबध तोडल्याने मनीषाचा दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपी किशनने पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी अधिक तपास करत आहेत.






