संग्रहित फोटो
दौंड : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता दौंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दौंड शहरात १४ एप्रिल रोजी रात्री एका युवकाला टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवत जबर मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान याप्रकरणी दौंड पोलिसांनी कुणाल साळुंखे, सिद्धार्थ सावंत, सुचित शेंडगे, ऋषिकेश शिंदे, जय डाळिंबे, पृथ्वीराज खंडाळे व इतर तीन अनोळखी साथीदार(सर्व रा. दौंड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अक्षय बालीसाब शिखरे (रा. जगदाळे वस्ती, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी रात्री ११. ४५ वाजताच्या दरम्यान येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी फिर्यादी अक्षय बालीसाब शिखरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आले होते. त्यावेळी फिर्यादी अक्षय शिखरे यांचा कुणाल साळुंखे यांना धक्का लागल्याने दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर रात्री पावणे बाराच्या दरम्यान आरोपींनी फिर्यादी यांना स्वामी समर्थ मंदिरासमोर बोलावून घेतले. त्यांना दमदाटी व शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.