
अन्न भेसळविरोधी कारवाईची धास्ती, पनीरसह भेसळीचे दुग्धजन्य पदार्थ गायब; खुले खाद्यतेलही बाजारातून गायब
लातूर : काल-परवापर्यंत हॉटेलमध्ये गेल्यावर नंतर पनीर, चिल्ली पनीर मसाला, पनीर तडका कढई, पनीर अशा पदार्थांची रेलचेल होती. पनीर शिवाय मेनू अपूर्ण वाटायचा पण आज अचानक अनेक ठिकाणी हे पदार्थ गायब दिसत आहेत. कारण विचारलं तर एकच उत्तर मिळतं, ‘पनीरचं शॉर्टेज आहे’. पण हे शॉर्टेज पनीर पुरते मर्यादित नाही. काही ठिकाणी मसाला दूध दिसत नाही. रबडीचे स्टॉल ओस पडलेत. बासुंदी विक्रेतेही शांत बसले आहेत. कालपर्यंत जोरात चाललेले काही व्यवसाय अचानक मंदावलेले दिसत आहेत.
हा निव्वळ योगायोग नाही. अन्न व औषध प्रशासनाने भेसळी विरोधात मोहीम तीव्र केल्यानंतर राज्यभरातून बोगस पनीर कृत्रिम दूध आणि भेसळयुक्त पदार्थांविरोधातील कारवायांच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. तपासणी पथके सक्रिय झाली आहेत. नमुने तपासली जाऊ लागले आहेत आणि अनेकांच्या झोपेचे खोबरे झाले आहे. यामुळेच आता ग्राहकांच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे, जे पदार्थ कालपर्यंत मुबलक प्रमाणात बाजारत उपलब्ध होते. ते आज अचानक दुर्मीळ झाले आहेत ते का झाले असा हां प्रश्न आहे. खरे पनीर बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात दूध लागते त्याचा खर्चही जास्त असतो पण बाजारात अनेकदा अतिशय कमी दरात पनीर उपलब्ध होत होते. काही ठिकाणी ते खऱ्या दुधापासून बनलेले होते.
खुले खाद्यतेल बाजारातून गायब
राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे अन्न व्यवसायिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून, अहमदपूरसह ग्रामीण भागातील बाजारपेठांमधून खुले खाद्यतेल विक्री जवळपास बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी टाक्यांमधून खुले खाद्यतेल विक्री केली जात होती. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता पॅकबंद खाद्यतेल विक्रीकडे व्यापाऱ्यांचा कल वाढला आहे. बाजारात पॅकिंग केलेले पाम तेल विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हॉटेल व्यवसाय, औषध विक्री, दूध विक्री तसेच किराणा दुकानांमधील विविध प्रकारच्या अनियमितता आणि भेसळीच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. भेसळयुक्त दूध, बनावट औषधांची विक्री, हॉटेलमधील अस्वच्छता तसेच खाद्यपदार्थांमध्ये विविध रासायनिक पदार्थांचा वापर यासारख्या बाबींवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
हे सुद्धा वाचा : धाराशिवमध्ये खळबळ! तरुणीचे अपहरण करून जबरदस्ती विवाह; मोटारसायकलवर बसवून नेले अन्…
अन्न व औषध प्रशासनाने गुटखा व पान मसाल्याचे उत्पादन, विक्री आणि साठवणुकीविरोधातही कठोर भूमिका घेतली आहे. अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, गंभीर प्रकरणांमध्ये मोक्का कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. याचबरोबर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेचीही नियमित तपासणी व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. लाभार्थ्यांना पुरविण्यात येणारे धान्य गुणवत्तापूर्ण आणि खाण्यायोग्य असल्याची खात्री प्रशासनाने करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.