
पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या
छत्रपती संभाजीनगर : दारू पितांना पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद एका मजुराच्या निघृण हत्येपर्यंत जाऊन पोहोचला आहे. कांचनवाडी परिसरातील वुडरीज स्कूललगतच्या मोकळ्या मैदानात तिघा मित्रांनी मिळून राजू किसन वंजारी (वय ३३, रा. गौतमनगर) यांना बेदम मारहाण करत त्यांचे डोके झाडावर आपटले. गंभीर जखमी झालेल्या राजू यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी काही तासांत तपास पूर्ण करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
मृताचे वडील किसन बापुराव वंजारी (वय ६६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री राजू वंजारी हे मित्र पांडुरंग काळूबा गायकवाड (४०), युवराज गोरक्ष गायकवाड (३८) आणि सोनू सर्जेराव गव्हाणे (३४, सर्व रा. काश्मीरनगर) यांच्यासह वुडरीज स्कूललगतच्या मोकळ्या मैदानात झाडाखाली बसून दारू पित होते. मद्यधुंद अवस्थेत पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तिघांनी मिळून राजू यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांचे डोके झाडावर जोरात आपटल्याने ते जागीच बेशुद्ध पडले. घटना घडल्यानंतर संशय टाळण्यासाठी आरोपींनी राजू यांना दुचाकीवरून त्यांच्या घरी आणून सोडले. डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून वडील किसन वंजारी यांनी त्यांची नाडी तपासली असता श्वास बंद झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आरोपींनीच त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर घाटी रुग्णालयात नेले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी आरोपींपैकी एकाने घडलेला प्रकार सांगितल्याने संशय अधिक बळावला.
हे सुद्धा वाचा : गरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू
कुटुंबाचा आधार हरपला
मूळ नांदेड जिल्ह्यातील राजू वंजारी गेल्या सुमारे २५ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन लहान मुले तसेच वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. आई गेल्या दोन वर्षांपासून पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळून असून पत्नी मोलमजुरी करून संसाराला हातभार लावत आहे. कमावता मुलगा गमावल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कांचनवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.