वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील निमसडा गावात एका थरारक आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शेतीच्या वादातून संतप्त झालेल्या पुतण्याने आपल्या काकू आणि चुलत भावाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केला. त्यानंतर त्याने स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे.
घटनेत मृत झालेल्यांमध्ये साधना सुभाष मोहिजे (वय 55) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (वय 27) यांचा समावेश आहे. या दोघांची हत्या महेंद्र मोहिजे याने केली आहे. प्राथमिक तपासानुसार, महेंद्र मोहिजे आणि नितीन मोहिजे यांच्यात शेतीच्या मालकी व उत्पन्नाच्या वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. गावातील काही जमिनी ठेक्याने लावण्याच्या विषयावरूनही तणाव वाढला होता.
नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून महेंद्र मोहिजे आणि नितीन मोहिजे यांच्यात शेतीच्या धुऱ्यांचे वाटप, उत्पन्नाचे हक्क, आणि काही जमिनी ठेक्याने लावण्यावरून वाद सुरु होता. शुक्रवारी सकाळी वाद विकोपाला गेला. महेंद्रने अचानक संतप्त होऊन आपल्या हातातली कुऱ्हाड घेऊन आधी नितीनवर वार केला आणि त्यानंतर साधना मोहिजे यांच्यावर हल्ला चढवला. दोघेही जागीच ठार झाले. या कृत्यानंतर महेंद्रने स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना समजताच अल्लीपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र मोहिजे हा साधना मोहिजे यांचा पुतण्या होता, तर नितीन मोहिजे त्याचा चुलत भाऊ होता. शेतीच्या मालकीहक्कावरून आणि उत्पन्नाच्या वाटपावरून अनेक दिवसांपासून हे वाद सुरू होते.सध्या पोलीस पुढील तपास करत असून, शेजारी आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात आहेत.
खळबळजनक! अमरावतीत एएसआयची हत्या; आधी गाडीने धडक, नंतर सपासप वार…..