Fadnavis On Yawat Voilence: "दोन्ही समाजाची लोकं..."; यवतच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
यवत: यवतमध्ये एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या राड्यामध्ये काही दुचाकी जाळण्यात आल्या. यवतमधील बाजारपेठ बंद झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार यवतमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पाचपेक्षा अधिक लोक एकत्रित येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान यवतमध्ये झालेल्या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
मी यवतमध्ये घेतलेल्या घटनेची माहिती घेतली आहे. एका बाहेरील व्यक्तीने चुकीची पोस्ट टाकल्याने आणि एका पुजाऱ्याने बलात्कार केल्याचा स्टेट्स ठेवल्याने तणाव निर्माण झाला. यामुळे काही लोक रस्त्यावर जमा झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला आहे. दोन्ही समाजाची लोक एकत्रितपणे बसून तणाव संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही लोक तणाव निर्माण व्हावा यासाठी जाणीवपूर्वक स्टेट्स ठेवत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. चुकीच्या पद्धतीने टीका करण्याचे अधिकारी कोणालाही नाहीत. या सर्व घटनेची चौकशी केली जाणार आहे. सर्वानी शांतता ठेवली आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. कुणी बेकायदेशीर कृत्य करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
दौंडचे आमदार राहुल कुल काय म्हणाले?
साधारणपणे गेले तीन ते चार दिवस सर्व प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी आम्ही आवाहन करत होतो. आजही मी तेच आवाहन करेन. जे चुकीचे वागले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. लोकांनी संयमाने घ्यावे असे आवाहन करतो. पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली आहे.
Yawat Voilence: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अन् यवतमध्ये जोरदार राडा, पोलिसांनी थेट…
काही दिवसांवपूर्वी यवतमध्ये एका मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आज यवतमध्ये एका सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गट आमने-सामने आले. अनेक दुचाकी पेटवून देण्यात आल्या. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.
काय म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर?
छत्रपती शिवाजी महाराज हे या हिंदुस्थानातील सर्व हिंदू धर्मियांचा आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सर्व लोक जातीपातीच्या भिंती बाजूला ठेवून एकत्रित येऊ शकतात हे त्यांना माहिती आहे. मग त्या अस्मितेवर घाला घालायचा. ज्यांना अटक केली आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.