
couple murdered own daughter to contest the Gram Panchayat election Nanded Crime News
संदेश देवके : नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षांत चिमुरड्या मुलींवरील अत्याचार, विनयभंग आणि अमानुष हत्यांचे प्रकार सातत्याने समोर येत असून, या घटनांनी संपूर्ण समाजमन हादरून गेले आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी कडक कायदे अस्तित्वात असतानाही अशा घटनांची पुनरावृत्ती होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. प्रत्येक घटनेनंतर संताप व्यक्त केला जातो, मात्र काही काळानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असल्याचे चित्र दिसून येते.
केरूर (ता. मुखेड) येथील रहिवासी पांडुरंग कोंडामंगले यांनी दोन अपत्य धोरण टाळण्यासाठी व आगामी ग्रामपंचायतची निवडणूक लढवण्यासाठी आपली मुलगी प्राची हिची हत्या केल्याचा घटना घडली. पांडुरंग याला दोन मुले आणि एक मुलगी. सत्तेसाठी केवळ दोन मुले असणे बंधनकारक असल्यामुळे त्याने स्वतःच्या मुलीचा बळी घेतला. अमानुष कटात गावचे सरपंच गणेश रामचंद्र शिंदे याने सल्ला दिल्याची माहिती आहे. यामुळे राजकीय व प्रशासकीय यंत्रणांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी पित्यानेच मुलीचा जीव घ्यावा,’ हा विचारही समाजाला काळिमा फासणारा आहे.
हे देखील वाचा : ही राजकीय नव्हे, विकासाची स्पर्धा…; दिल्लीतील भेटीगाठीबाबत खासदार अशोक चव्हाण यांची मार्मिक टिप्पणी
मुखेडमध्ये ८ नोव्हेंबर २०२५ रोजी ६ वर्षांच्या चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. देगलूर तालुक्यातील आलूर येथे १३ जून २०२४ रोजी ३ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर बिलोली जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षीय आरोपीला ५ वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. तसेच ५ जानेवारी २०२६ रोजी नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे ६० वर्षीय व्यक्तीने ८ वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण
नांदेड शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या ७ वर्षांच्या चिमुकलीवर त्याच शाळेतील शिक्षकाने १९ नोव्हेंबर २०२५ रोजी अत्याचार केल्याची घटना देखील उघडकीस आली आहे. मुलगी शाळेत जाण्यास नकार देत असल्याने पालकांनी चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. शाळेसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच असा गुन्हा घडल्याने पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व घटनांमुळे जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संघटना व महिला संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशा मागण्या जोर धरत आहेत. “कायदे कागदावर असून उपयोग नाही, तर त्यांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे,” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा : Epstein Filesमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचे नाव; खासदार राऊतांचा गौप्यस्फोट
सीसीटीव्ही बसविण्याची मागणी
तसेच शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे, पोलिस गस्त वाढवणे आणि बालसुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याचेच मागणी होत आहे. दरम्यान, मुलीच्या सुरक्षेसाठी राष्ट्र प्रथम अभियान अंतर्गत राज्य शासना-शालेय स्तरावर स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारी ते २० मार्च ८ कालावधीत मार्शल आर्टस, योग, प्राणायाम तसेन मानसिक व व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा उपक्रम स्वागतार्ह असला तरी, केवळ प्रशिक्षण पुरेसे नसू समाजातील विकृत मानसिकतेवर कठोर कारवाई होणे तितकेव आवश्यक आहे. एकूणच नांदेड जिल्ह्यातील या घटना समाजासाठी इशारा देणाऱ्या आहेत. चिमुकल्या मुलींची सुरक्षितत ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. जोपर्यंत समाज म्हणून आपण ठाम भूमिका घेत नाही तोपर्यंत अशा अमानुष घटनांना आळा बसणार नाही, है वास्तव आहे.