Dombivli : साडे सहा हजार कुटुंब बेघर, गॅंग ऑफ डोंबिवलीवर कारवाई कधी होणार? दीपेश म्हात्रेंचा सवाल
डोंबिवलीमध्ये अनधिकृत बांधकामावर मनपा कायदेशीर कारवाई करत असताना अनधिकृत इमारतींमधील नागरिकांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर त्या 65 इमारतींमधील रहिवाशांच्या घरांवर कारवाईची टांगती तलवार आहे .या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाने या रहिवाशांना पाठिंबा दर्शवला . या इमारतीमधील रहिवाशांचा मेळावा आणि पत्रकार परिषद घेत घरांवर कारवाई होऊ देणार नाही. याबाबत आदित्य ठाकरेंसह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत असे सांगितले आहे.
यावेळी ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी “ज्यांची फसवणूक झाली त्यांच्यावर कारवाई मात्र ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर कारवाई नाही हा कोणता न्याय”असा सवाल उपस्थित केला. यावेळी बोलताना ज्या कथित बिल्डरांवर गुन्हे दाखल झाले ते बिल्डर नाहीत, सूत्रधार दुसरेच आहेत, खोटे कागदपत्र बनवले खोटे कागदपत्रांच्या आधारे रजिस्ट्रेशन केले. शासनाची फसवणूक केली मात्र याप्रकरणी खोटी कागदपत्र बनवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाही, त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप देखील म्हात्रे यांनी केला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी सांगितले
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या खोट्या कागदपत्राच्या आधारे महारेरा प्रमाणपत्र मिळविलेल्या 65 इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश दिले .त्यानंतर इमारत वाचविण्यासाठी न्यायलयात गेलेल्या साई गलेक्सी इमारतीची याचिका देखील न्यायालयाने फेटाळून लावल्याने या इमारतीवर कारवाई होण्याचे निश्चित झाले आहे. यामुळे या इमारती मधील रहिवासी हवालदिल झाले आहेत. आपल्याला खोटी कागदपत्र देऊन आपली फसवणूक करणाऱ्या विकासकावर, पालिका अधिकाऱ्याना रान मोकळे करून आपल्यावर अन्याय का असा प्रश्न या इमारती मधील रहिवाशांनी उपस्थित केला आहे .
शिवसेना ठाकरे गटाने रहिवाशांच्या बाजूने आज मेळावा आणि पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे .आज ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे व इतर पदाधिकारी या 65 इमारती मधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी पत्रकार परिषदेत कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी निवडणुकीत घरांवर कारवाई होऊ देणार नाही असे म्हणनारे नेते निवडणुकीत जिंकून आल्यानंतर कुठे आहेत ,ऑर्डर निवडणुकीत का लपवून ठेवली असा सवाल केला .रहिवाशांच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले .
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी याप्रकरणी रहिवाशांचा कोणताही दोष नसताना त्यांच्यावर कारवाई होत आहे ,मात्र ज्यानी रेराचे खोटे पेपर बनवले ,खोटे रजिस्ट्रेशन केले त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही, या प्रकरणात अशा कोणत्याही व्यक्तीला अटक केलेली नाही..मग कारवाई फक्त दिखाव्यासाठी होती का असा सवाल केला .
या प्रकरणाची 65 बिल्डरांची यादी दिली ते खरे बिल्डर नाही ,डमी उभे केले आहेत, या यादीत प्रत्यक्ष त्या बांधकाम साइटवर काम करणारे इलेक्ट्रिशन, प्लंबर ,लेबर यांची नावे आहे. त्यांची बांधकाम व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नाही.हे मोठे रॅकेट आहे ,या रॅकेटला राजकीय वरदहस्त आहे. ते उघड झाले पाहिजे अशी मागणी केली .या रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीरपणे उभा राहील या लोकांवर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी रस्त्यावरची लढाई लढू, त्याचबरोबर न्यायालयीन लढाई देखील लढू असा इशारा जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी दिला आहे .