
आजारी पडल्यावर बरे होण्यासाठी चक्क अस्थींचेच सेवन; जादूटोण्याच्या नादात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
रांची : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात अवघ्या 10 दिवसांत एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आजारी पडल्यावर या कुटुंबाने नियमित वैद्यकीय उपचारांऐवजी जादूटोण्याचा आधार घेतला आणि एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून कथितरित्या अस्थींचे सेवन केले.
डॉक्टरांना आता संशय आहे की, अस्थीच्या सेवनाने त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी अंतर्गत अवयव आणि इतर नमुन्यांची तपासणी केली जात आहे. ही घटना पाडवा ब्लॉकच्या सिक्का गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाचे प्रमुख कुलदीप महातो यांचा १९ जून रोजी मृत्यू झाला. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मुलीचाही मृत्यू झाला. यानंतर, कुटुंबातील इतर सदस्यांनी लेस्लीगंजच्या पूर्णडीह परिसरात वैद्यकीय उपचार आणि जादूटोण्याचा आधार घेणे सुरू ठेवले. याच काळात त्यांनी कथितरित्या अस्थींचे सेवन केले.
कुलदीप महातो यांची दुसरी मुलगी, इंदू कुमारी, हिचा २६ जून रोजी मृत्यू झाला. २८ जून रोजी सून श्वेता कुमारी हिचा मृत्यू झाला आणि २९ जून रोजी रांची येथील रिम्समध्ये उपचार घेत असताना मुलगा नकुल महातो याचाही मृत्यू झाला.
तपासानंतर मृत्यूचे कारण होईल उघड
तपास पूर्ण झाल्यावरच मृत्यूचे नेमके कारण निश्चित होईल. डॉक्टरांनी असेही सांगितले की, या प्राथमिक टप्प्यावर जलोदर (ड्रॉप्सी) सारख्या आजाराची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुटुंबाने वापरलेल्या मोहरीच्या तेलासह इतर वस्तूंचीही तपासणी केली जात आहे.
नमुने तपासणीसाठी पाठवले
पालमूचे सिव्हिल सर्जन डॉ. अनिल कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, कुटुंबाला रुग्णालयात उपचार घेण्याचा अनेक वेळा सल्ला देण्यात आला होता. परंतु, त्यांनी जादूटोण्यासोबत वैद्यकीय उपचार घेणे सुरूच ठेवले. अस्थींचे सेवन केल्याची माहिती मिळाल्यानंतर, नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. सर्व मृतांचे अंतर्गत अवयव मेदिनीराई मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात जतन करून ठेवण्यात आले असून, ते न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवले जातील.