
गणपतीपुळे समुद्रात पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे 5 जण बुडाले, पर्यटनाचा आनंद क्षणात विरला
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी १०. ३० वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले आहेत. बुडलेल्यांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून, उर्वरीत चौघांसाठी युध्दपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक ग्रुप गणपतीपुळे येथे शुक्रवारी १९ जून रोजी रात्रीच्या सुमारास दाखल झाला होता. हा ग्रुप देवदर्शन व पर्यटनासाठी खाजगी वाहनाने आला होता. या ग्रुपने 19 जून रोजी रात्रीच्या सुमारास गणपतीपुळे येथे एका खाजगी लॉजिंगवर मुक्काम केल्यानंतर शनिवारी सकाळी गणपती मंदिरात जाऊन स्वयंभू श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यातील पाच जण समुद्राच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले. उर्वरित 14 जण समुद्र चौपाटीवर थांबले होते. मात्र, समुद्रात अंघोळीसाठी उतरलेले पाच जण पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने समुद्राच्या पाण्यात ओढले गेले आणि बुडाले. पाच तरुण पर्यटक बुडत असल्याचे काहींनी पाहिले आणि त्यांनी मदतीसाठी आरडा ओरड सुरु केली. पर्यटक बुडत असल्याचे लक्षात येताच किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तातडीने समुद्रात धाव घेतली. त्यांनी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला.
सध्या समुद्रात पाण्याचा करंट (पाण्याचा वेगवान प्रवाह) प्रचंड प्रमाणात आहे. समुद्राला उधाण असल्यासारखी परिस्थिती असल्याने आणि पाण्याचा प्रवाह खेचणारा असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि जीवरक्षक, स्थानिक व्यावसायिकानी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. मात्र त्याला यश आले नाही. समुद्रात बुडालेल्या पाच जणांमध्ये आदित्य संतोष राऊत (वय, वर्षे २२), अनिकेत बंडू हिवराळे (वय, वर्षे २०) आनंद राजू नरवडे (वय, वर्ष २०), प्रेम दीपक आदमाने (वय, वर्षे १९) यश रामेश्वर कांबळे (वय वर्षे १९) सर्व राहणार बीडकिंन, जिल्हा संभाजीनगर ,तालुका पैठण यांचा समावेश आहे.
कोस्गार्डसह स्थानिक मच्छीमारांची मदत
या पाच जणांचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने कोस्गार्डसह स्थानिक मच्छीमारांची मदत घेतली. स्वतः पोलीस अधीक्षक नितीन बघाटे हे पोलिसांच्या हायस्पीड गस्ती नौकेतून शोधकार्यात सहभागी झाले होते. तर दुसरीकडे स्थानिक मच्छिमार आपल्या नौका घेऊन शोधकार्यात सहभागी झाले होते. कोस्टगार्डची विशेष टीमदेखील युद्धपातळीवर शोध घेत होती.
समुद्रात बुडालेले पाच जण अविवाहित असून ते आपल्या मित्रांसमवेत देवदर्शन व पर्यटनासाठी आले होते. एकूण १८ जणांचा ग्रुप पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आला होता. काहींच्या डोळ्यादेखत ५ जण बुडाले. आपल्या ग्रुपमधील तरुण बुडताना पहिल्याने ग्रुपमधील काहीजण किनाऱ्यावर कोसळले. यावेळी स्थानिकांनी त्यांना सावरले.
गणपतीपुळे येथे समुद्रात पाच जण बुडाल्याची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे आदींनी गणपतीपुळे समुद्रकिनारी भेट देऊन झालेल्या घटनेची माहिती घेऊन शोधकार्य प्रभावी राबविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
यावेळी समुद्रकिनारी असलेल्या पर्यटकांना समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नये, असे आवाहन पोलिसांच्या मार्फत केले जात होते. जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने तैनात केलेले होमगार्ड संदेश धावडे, अंकुश घाणेकर जीवरक्षक आशिष माने, उमेश म्हादये,व्यावसायिक केतन धनावडे ,रोहित चव्हाण, मुबारक सुतार आदींनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न केले. तसेच त्यांच्या जोडीला समुद्रकिनारी तैनात असलेले अन्य होमगार्ड, पोलीस कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिक यांचे विशेष योगदान लाभले. दरम्यान समुद्रकिनारी घडलेली मोठी दुर्घटना लक्षात घेता जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील व त्यांचे सहकारी समुद्रकिनाऱ्यावर विशेष गस्त घालून पर्यटकांना समुद्राच्या धोक्याविषयी सूचना व माहिती देण्याचे काम करीत आहेत.
दरम्यान गणपतीपुळे येथे मोठ्या गर्दीचा उन्हाळी पर्यटन हंगाम चांगल्या स्थितीत गेल्यानंतर पावसाळी पहिल्या जून महिन्यातच ही घटना घडली आहे. या ठिकाणी पर्यटकांना वेळोवेळी समुद्राच्या धोक्याविषयी सूचना देण्याचे काम पोलीस यंत्रणा, जीवरक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिकांकडून केले जाते मात्र त्या सूचनांकडे दुर्लक्ष करून काही अतिउत्साही पर्यटक समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करताना त्यातच अशा घटना घडून गणपतीपुळे तीर्थक्षेत्राला गालबोट लागत असल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र अजूनही पावसाळी स्थिती लक्षात घेऊन आलेल्या पर्यटकांनी समुद्रस्नानाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करताना समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नये असे आवाहन जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.