लोणी काळभोर हादरलं! शेतकऱ्याच्या डोक्यात घातला कोयता; शेतातील मजुरांवरही दगडफेक
पुणे : वादविवादातून लोण काळोभर परिसरात शेतकऱ्यावर एका सराइताने व साथीदारांनी कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सराइतासह त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विजय श्रीरंग काळभोर (वय ४६, रा. रायवाडी, लोणी काळभोर, सोलापूर रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सोन्या उर्फ निखिल घायाळ याच्यासह पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, घायाळ याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. काळभोर आणि घायाळ यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. २३ डिसेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास काळभोर यांचा भाऊ दीपक शेतात काम करत होते. त्यावेळी आरोपी घायाळ साथीदारांसह तेथे आला. त्यांच्याकडे कोयते आणि गज होते. आरोपींनी दीपक यांना शिवीगाळ करुन धमकाविण्यास सुरुवात केली. त्यानंतर दीपक यांनी भाऊ विजय यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. विजय तेथे दुचाकीवरुन शेतात आले. घायाळने विजय यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. घायाळबरोबर असलेल्या साथीदाराने त्यांना गजाने मारहाण केली. आरोपींनी काळभोर यांच्या शेतातील मजुरांना शिवीगाळ केली. दगडफेक करुन आरोपी पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एसटी स्थानकात चोरी करणार्या महिलांना घेतले ताब्यात
दोन तरुणांवर कोयत्याने वार
गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.