15 दिवस नवऱ्यासोबत अन् 15 दिवस...; 10 वेळा पळून गेलेल्या विवाहितेची अजब ऑफर
उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका विवाहित महिलेने गावाच्या पंचायतीत असा प्रस्ताव ठेवला, तो ऐकून तिचा पती, पंचायतीचे सदस्य आणि गावकरी थक्क झाले. या महिलेने स्पष्टपणे सांगितले की, तिला महिन्यातील 15 दिवस तिच्या पतीसोबत आणि 15 दिवस तिच्या प्रियकरासोबत राहायचे आहे. ही महिला आतापर्यंत 10 वेळा तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे, आणि तिचा हा वादग्रस्त प्रस्ताव आता परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
हे संपूर्ण प्रकरण अझीमनगर पोलीस स्टेशन परिसरातील आणि रामपूरच्या तांडा पोलीस स्टेशन परिसरातील दोन गावांशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार अझीमनगर पोलीस स्टेशन परिसरातील एका तरूणीच लग्न दीड वर्षांपूर्वी शेजारच्या गावात राहणाऱ्या एका तरुणाशी झालं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतर, विवाहित महिलेचं तांडा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम प्रकरण सुरु झालं. एक वर्षापूर्वी ती महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. पंचायतीनंतर पतीने पत्नीला घरी परत नेले. मात्र यानंतर ती महिला एकाच वर्षात तब्बल 9 वेळा पळून गेली होती. मात्र शेवटच्या वेळी ती घरी परत आलीच नाही.
अखेर आठवड्यापूर्वी तिच्या पतीने अझीमनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यादरम्यान, पतीने गुन्हा दाखल न करता पत्नीला तिच्या प्रियकराकडून परत आणण्याची मागणी केली होती. पोलिसांनी पत्नीला परत आणलं आणि पतीच्या स्वाधीन केले. पण अवघी एक रात्र पतीच्या घरी घालवल्यावर ती महिला चक्क 10 व्यांदा तिथून फरार झाली. पत्नी पुन्हा घरातून बेपत्ता झाल्याचे कळताच पतीला धक्का बसला. यानंतर, पती आपल्या पत्नीच्या प्रियकराच्या घरी गेला तेव्हा त्याला त्याची पत्नी तिथे आढळली. पतीने आपल्या पत्नीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिला घरी परतण्यास सांगितले.
दरम्यान त्यानंतर पंचायत बोलावण्यात आली. आणि तिथेच पत्नीने सर्वांसमोर अजब प्रस्ताव ठेवला. मी 15 दिवस पतीसोबत आणि 15 दिवस प्रियकरासोबत राहू इच्छिते असं तिने सर्वांना सांगितलं. मात्र तिचं हे बोलणं, तो प्रस्ताव ऐकताच पंचायतीत उपस्थित असलेले लोक हैराण झाले. पत्नीचा प्रस्ताव ऐकताच पती तर थेट हात जोडूनच उभा राहिला. तो म्हणाला, मला माफ कर, आता तू तुझ्या प्रियकरासोबतच रहा. यानंतर, पतीने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकराच्या घरी सोडलं आणि तो थेट त्याच्या आपल्या घरी परतला. ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.