
पैशाच्या वादातून हत्या, कालव्यात आढळला जळालेला मृतदेह; खुनाचा थरारक कट उघडकीस
अमरावती : पथ्रोट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खोडगाव रोडवरील जहानपूर शेतशिवारात शाहनूर धरणाच्या कालव्यात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेह प्रकरणाचे बिंग फुटले आहे. प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून मोठा खुलासा केला आहे. शेख शाहरुख शेख रौफ (रा. आर्वी, जि. वर्धा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात एका अल्पवयीनालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
बुधवारी पथ्रोट पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले एएसआय रवींद्र रामभाऊ शिंपी यांना वाघडोहचे पोलिस पाटील सुभाष काकड यांनी फोनवरून अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह पडल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शाहनूर धरणाच्या कालव्यात अर्धवट जळालेला मृतदेह शोधून काढला. घटनास्थळी चारचाकी वाहनाच्या टायरच्या खुणा आढळून आल्या. प्राथमिक तपासात अन्यत्र हत्या करून मृतदेह ओळख लपवण्यासाठी जाळून कालव्यात टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा, पथ्रोट, रहिमपूर व अंजनगाव सुर्जी येथून विशेष पथके तयार करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू झाला. तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पद्मश्री हॉटेलचा मालक शुभम रॉय संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी टिकेश प्रशांत महाजन (२८), प्रशांत हरिचंद्र महाजन (५९), शुभम मोहनलाल रॉय (२८), अली अजगर सबदार हुसेन (२८), हर्षित प्रकाश गौर (१९) व निखिल गौर (३२) यांना अटक केली आहे. एका अल्पवयीनालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीकडून सुमारे ५ लाख किमतीचे चारचाकी वाहन तसेच एकूण ५ लाख ७० हजार किमतीचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपासासाठी आरोपीना पथरोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज कुमावत व उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे, पोनि सूरज बोडे, उपनिरीक्षक अनंत वडतकर, अभय चौथणकर, सचिन पवार, सागर हटवार, नितीन इंगोले तसेच सायबर पोलिस स्टेशनचे विकास अंजीकर व सागर धापर यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
तपासात उघडकीस आले की शेख शाहरुख याने पैशाच्या वादातून प्रशांत महाजन यांच्यावर अत्याचार व हल्ला केला होता. यामुळे संतप्त झालेल्या प्रशांत महाजन, त्यांचा मुलगा टिकेश महाजन व साथीदार अली अजगर यांनी शाहरुखच्या हत्येचा कट रचला. अली अजगरने पैशांचे आमिष दाखवून शाहरुखला गावाबाहेर बोलावले. तेथे टिकेश व अली यांनी त्याला मारहाण करून ठार केले. नंतर मृतदेह चारचाकी वाहनातून नेऊन शुभम रॉय यांच्याकडे सोपवण्यात आला. शुभम रॉय, हर्षित गौर व निखिल गौर या कर्मचाऱ्यांसह मृतदेह शाहनूर कालव्यात नेऊन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.