
अवयवदानातून मिळते इतरांना नवजीवन! अमरावतीत विविध उपक्रम; गैरसमज दूर करून जागृतीची गरज
मृत्यूनंतरही आपल्या शरीरातील अवयव दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करू शकतात. हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे यांसह डोळ्यांचे दान करून गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना नवजीवन मिळू शकते. ‘अवयवदानाचा संकल्प करा; मृत्यूनंतरही कोणाच्या तरी आयुष्यात नवजीवनाची पहाट आणा,’ असा संदेश जागतिक अवयवदान दिनानिमित्त देण्यात येत आहे. अवयवदान जनजागृतीच्या उद्देशाने येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ३ ते १३ ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आ. सुलभा खोडके यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करीत, ‘एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनाची नवी संधी मिळू शकते. त्यामुळे अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती आवश्यक आहे’, असे सांगितले. राष्ट्रीय व जागतिक अवयवदान जनजागृती अभियानांतर्गत ‘ग्रीन लाईट’ मोहिमेतून हे उपक्रम राबविले जात आहेत. रॅली, व्याख्याने, शपथविधी आणि प्रबोधनपर कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती केली जाणार आहे.(फोटो सौजन्य – istock)
मेंदूमृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची संमती आणि वैद्यकीय निकष पूर्ण झाल्यानंतर विविध अवयव प्रत्यारोपणासाठी दान करता येतात. अवयवदानानंतर शरीराची विटंबना होते किंवा अंत्यसंस्कारात अडथळा येतो, हे गैरसमज आहेत. प्रक्रिया प्रशिक्षित वैद्यकीय पथकाकडून नियमांनुसार आणि सन्मानपूर्वक केली जाते. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत आरोग्य यंत्रणेकडून माहिती घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अवयवदानाची इच्छा व्यक्त केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्या निर्णयाची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांशी अवयवदानाबाबत चर्चा करून आपली इच्छा स्पष्टपणे सांगावी, असे आवाहन आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केले जाते. अमरावतीतील हरीना फाउंडेशन गत १६ वर्षांपासून नेत्रदान, अवयवदान आणि देहदानाबाबत सातत्याने जनजागृती करीत आहे. या कार्याची सुरुवात एका चिमुकलीच्या निधनातून झाली. ८ मे २०१० रोजी साडेतीन वर्षीय हरीना नरेश सोनी हिचे विजेचा धक्का लागून निधन झाले. याप्रसंगी कुटुंबीयांनी तिचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यातून दोन नेत्रहीनांच्या जीवनात प्रकाश आला. १० मे २०१० रोजी तिच्या स्मृतिप्रित्यर्थ हरीना नेत्रदान समितीची स्थापना झाली आणि पुढे या उपक्रमाचे मोठ्या जनआंदोलनात रूपांतर झाले.
Ans: मृत्यूनंतर किंवा काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींमध्ये दान केलेले अवयव गरजू रुग्णांच्या प्रत्यारोपणासाठी वापरले जातात. यालाच अवयवदान म्हणतात.
Ans: दान केलेल्या अवयवांमुळे एकापेक्षा अधिक रुग्णांना प्रत्यारोपणाची संधी मिळू शकते. त्यामुळे अवयवदानाला जीवनदानाचे महत्त्व आहे.
Ans: वैद्यकीय निकषांनुसार हृदय, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड यांसारखे अवयव तसेच कॉर्निया आणि काही ऊती दान करता येऊ शकतात.