
तीन दिवसांत अपहरणाच्या तीन घटनांनी खळबळ
छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागांतून अल्पवयीन मुले-मुली अचानक बेपत्ता झाल्याच्या घटना वाढीस लागल्या असून, अवघ्या तीन दिवसांत तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत अपहरणाच्या तक्रारी दाखल झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुकुंदवाडी जे सेक्टर परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाची अल्पवयीन मुलगी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी राहत्या घरातून बेपत्ता झाली. फिर्यादी यांच्या पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या, तर ते आपल्या छोट्या मुलीला शाळेत सहलीकरीता सोडण्यासाठी बाहेर गेले होते. घरी परतल्यानंतर काही वेळाने मोठी मुलगी घरात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. आजूबाजूला तसेच मुलीच्या मैत्रिणींमध्ये शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर अज्ञाताने मुलीचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
जवाहरनगरमध्ये मुलगी घरातून झाली बेपत्ता
जवाहरनगर परिसरातील विष्णूनगर येथे ५ फेब्रुवारी रोजी मुलगी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. पालकांनी रेल्वे स्टेशन, बसस्थानक, नातेवाईकांकडे तसेच परिसरात तिचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. अखेर अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा संशय मुलीच्या पलकांनी व्यक्त केल आहे. प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा हद्दीत अल्पवयीन मुलाचे अपहरण
सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राहुलनगर, रेल्वे स्टेशन परिसरातून ३ फेब्रुवारीच्या रात्री अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला. रात्री उशिरापासून पहाटेपर्यंतच्या दरम्यान ही घटना घडली. तक्रारदारांनी अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलाला पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिस तपासाला वेग
तिन्ही प्रकरणांत अपहरणाचा संशय असल्याने संबंधित पोलिस ठाण्यांकडून शोध मोहिमा राबवण्यात येत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासणे, नातेवाईक व परिचितांची चौकशी तसेच रेल्वे व बसस्थानकांवर माहिती पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, अल्पवयीन मुले-मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हेदेखील : Bihar Crime: चार मित्रांनी एकत्र घेतलं उचललं टोकाचं पाऊल; एकाच कंपनीत करायचे नोकरी; काय घडलं नेमकं ?