
crime (फोटो सौजन्य: social media)
पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरण: महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी या प्रकरणातील माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 8 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 20 वर्षांनंतर आलेल्या या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या निर्णयामुळे निंबाळकर कुटुंबासाठी हा मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
3 जून 2006 रोजी मुंबईहून धाराशिवकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा चालक समद काझी यांचाही मृत्यू झाला होता. दोन हल्लेखोरांनी पाठलाग करून गोळ्या झाडल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला कळंबोली पोलिसांकडे, त्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेकडे आणि पुढे सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने या हत्येमागे राजकीय वैर असल्याचा दावा केला होता. या प्रकरणात माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 8 आरोपी होते. यामध्ये सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलास यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे यांचा समावेश होता.
न्यायालयाने पुराव्यांवर उपस्थित केले प्रश्न
निकाल वाचताना न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी तपासातील त्रुटींवर गंभीर निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने सांगितले की, हा खटला मुख्यतः माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांच्या जबानीवर आधारित होता. मात्र, त्यांच्या जबाबांमध्ये मोठी तफावत आढळून आली. न्यायालयाने म्हटले की, साक्षीदाराला पोलिसांनी बेकायदेशीर ताब्यात ठेवून कबुलीजबाब घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. हा पुरावा कायद्याच्या चौकटीत ग्राह्य ठरत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, तपास यंत्रणांनी आरोपींचे मोबाईल, कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक पुरावे योग्य पद्धतीने सादर केले नसल्याचेही न्यायालयाने सांगितले.
राजकीय वैर होते, मात्र पुरावे आवश्यक
न्यायालयाने पवनराजे निंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यात राजकीय मतभेद असल्याचे मान्य केले. तेरणा साखर कारखाना आणि निवडणुकीच्या कारणावरून दोघांमध्ये राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. मात्र, केवळ राजकीय वैमनस्याच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येणार नाही. त्यासाठी ठोस आणि विश्वासार्ह पुरावे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
तपासातील त्रुटींवर न्यायालयाची नाराजी
न्यायालयाने तपासातील अनेक बाबींवर प्रश्न उपस्थित केले. आरोपींमध्ये संपर्क असल्याचे सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले कॉल डिटेल्स, मोबाईल पुरावे आणि इतर तांत्रिक माहिती तपास यंत्रणांनी योग्य प्रकारे सादर केली नसल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच, गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासंदर्भातील कागदपत्रे आणि साक्षीदारांच्या जबानीमध्येही विसंगती आढळल्याचे न्यायालयाने नमूद केले.
ओमराजे निंबाळकर कुटुंबाला मोठा धक्का
पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या या न्यायालयीन लढाईचा निकाल अखेर 20 वर्षांनी आला आहे. निकालाच्या वेळी पवनराजे यांचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर निंबाळकर कुटुंबासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, या निकालावर ओमराजे निंबाळकर यांची पुढील भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Pune Crime: मूल होत नसल्याच्या टोमण्यांनी गाठलं टोक; पुण्यात 27 वर्षीय IT इंजिनिअर महिलेची आत्महत्या
Ans: 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
Ans: मुंबई सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 8 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
Ans: न्यायालयाने तपासातील त्रुटी, अपुरे पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती यामुळे आरोपींना दोषी ठरवता येणार नसल्याचे सांगितले.