
दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
शिक्रापूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, शिवीगाळ, धमकी यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक घटना उघडकीस आहेली आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोलिसांशी अरेरावी करून शिवीगाळ व दमदाटी करत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याची घटना घडली आहे. तसेच पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी विकी बाळासाहेब हरगुडे याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार बापू हाडगळे, पोलीस शिपाई संतोष बाबर आणि शरद कारकुड हे आपले नियमित कर्तव्य बजावत असताना डायल ११२ वर एका व्यक्तीने फोन करून एक व्यक्ती मला शिवीगाळ करत असल्याची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तीला आपण नेमके कुठे आहात आणि कोण शिवीगाळ करत आहे, अशी विचारणा केली.
दरम्यान संबंधित व्यक्तीने फोनवरच पोलिसांशी अरेरावी करत “मीच पोलीस ठाण्यात येतो” असे सांगितले. त्यानंतर तो शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात आला. यावेळी तो दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले. त्याने पोलिसांशी शिवीगाळ, दमदाटी करत आरडाओरडा केला. तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करत पोलिसांकडून सुरू असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
याबाबत पोलीस शिपाई संतोष सुदाम बाबर (वय २५ वर्षे, रा. शिक्रापूर ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विकी बाळासाहेब हरगुडे (वय ३२ वर्षे, रा. सणसवाडी ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश करपे हे करत आहेत.
हे सुद्धा वाचा : बारामतीत लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…
गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का?
पुणे शहरापासून अत्यंत जवळचा तालुका म्हणून पुरंदरची ओळख आहे. सासवड शहर पुण्याचे उपनगर म्हणून बघितले जात आहे. मात्र, सध्या तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना संघटीतपणे मारहाण केली जात आहे. दुचाकीस्वार सायलेन्सरच्या पुंगळ्याचे मोठाले आवाज करून मोकाट फिरत आहेत. चोरीच्या मोठमोठ्या घटनांचा तपास केवळ कागदावर दिसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी, केबल चोरून नेल्या जात आहेत. एकूणच गुन्हेगार मोकाट सुटल्याचे दिसत असून पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.