संग्रहित फोटो
काही व्यक्ती बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीरपणे वाहतूक करून त्यांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती सीमा शुल्क विभागाच्या प्रतिबंधक व गुप्तचर शाखेला मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत अधीक्षक हिमांशु शर्मा यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या कारवाईत अधीक्षक लक्ष्मीकांत भातकर, संदीप कौशिक यांच्यासह निरीक्षक राजेश लाडे, रोहित भालेकर, रितिक कुंभलवार, रमेश गुप्ता, अंकित सिन्हा आणि हवालदार संजय जाधव व अभिषेक यादव यांचा सहभाग होता. रत्नागिरी विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, वन्यजीव तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त
पथकाने रविवारी (दि. २९ मार्च) पहाटेच्या सुमारास कोल्हापूर महामार्गावर सापळा रचला. यावेळी संशयास्पद वाटणारी एक मॅरून रंगाची किया सेल्टोस गाडी अडवून तिची कसून झडती घेतली असता, त्यात दोन बिबट्यांची कातडी लपवून ठेवल्याचे उघड झाले. सीमा शुल्क विभागाने ही कातडी आणि तस्करीसाठी वापरलेली गाडी जप्त केली असून, घटनास्थळावरून काही आक्षेपार्ह कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक उपकरणेही ताब्यात घेतली आहेत.
विविध जिल्ह्यांतील रहिवासी
या कारवाईत अटक करण्यात आलेले चार आरोपी विविध जिल्ह्यांतील रहिवासी आहेत. त्यापैकी दोन आरोपी कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील असून, इतर दोन जण सातारा आणि लातूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व आरोपींना कोल्हापूरच्या वडगाव न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात येणार आहे.
हे सुद्धा वाचा : नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना! पोत्यात सापडला शिरविरहित मृतदेह; टॅटूमुळे ओळख पटली






