
22 शेतकऱ्यांच्या केबल चोरीचा छडा, पण पोलिसांच्या भूमिकेवर संशय; ग्रामीण भागात रंगली चर्चा
बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या मोटारपंपाच्या केबली कापून चोरी केल्या आणि त्यातील तांबे काढण्यासाठी त्या जाळल्या. या चोरीग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेही नाव असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाला विशेष प्राधान्य देण्यात आले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या चोरीसंदर्भातील अनेक तक्रारी महिनोनमहिने प्रलंबित राहतात. मात्र या प्रकरणात तपासाला मिळालेली गती पाहता नागरिकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी प्रभावशाली कुटुंबाचे नाव समोर आल्याने पोलिस यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याची चर्चा ग्रामीण भागात रंगू लागली आहे.
दरम्यान, पाल (ता. कराड) येथील शेतकरी रविंद्र पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, वर्ष २०२५ मध्ये उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या कलिंगड चोरी व ऊस जळीत प्रकरणांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली असती, तर आज समोर आलेले गुन्हेगारी जाळे खूप आधीच उघड झाले असते. वेळेत कारवाई झाली असती तर लाखो रुपयांचे नुकसान टाळता आले असते, असा त्यांचा दावा आहे. रविंद्र पाटील यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी उंब्रज पोलीस, कराड उपविभागीय पोलीस कार्यालय आणि जिल्हा पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी व निवेदने दिली. मात्र अपेक्षित कारवाई झाली नाही. उलट अर्ज, निवेदने आणि पत्रव्यवहाराच्या प्रक्रियेत त्यांना गुंतवून ठेवण्यात आले.
कॉपर वायर चोरी प्रकरणात आरोपींची नावे समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात नव्या चर्चांना उधाण आले आहे. गावपातळीवरील अनेक हालचालींची माहिती असूनही स्थानिक पोलीस यंत्रणेला याचा सुगावा कसा लागला नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. बीट अंमलदार, स्थानिक पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेख व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
रविंद्र पाटील यांचा दावा आहे की, त्यांच्या शेतातील कलिंगड चोरी आणि ऊस जळीताच्या घटना या वेगळ्या स्वरूपाच्या नसून एका मोठ्या गुन्हेगारी साखळीतील सुरुवातीच्या कड्या होत्या. त्यांच्या मते या संपूर्ण प्रकरणात दलाल, व्यापारी आणि आंतरजिल्हास्तरीय टोळीची भूमिका असू शकते. गेल्या दोन वर्षांत या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दुसरीकडे, ग्रामीण भागात वाढत्या केबल चोरीच्या घटनांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी आरोपींची अटक आणि चोरीच्या मालिकेचा उलगडा ही पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे. बोरगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले आहे. मात्र त्याचवेळी एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचे नाव समोर आल्यानंतरच तपासाला वेग मिळतो का, की सामान्य शेतकऱ्यांनाही तितक्याच तत्परतेने न्याय मिळतो, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून तक्रारदाराची कायदेशीर लढाई सुरू आहे. मात्र कॉपर वायर चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर उंब्रज परिसरातील जुन्या गुन्ह्यांचा फेरतपास होणार का, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामीण नागरिकांचे म्हणणे आहे की, कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान असतील तर प्रत्येक शेतकऱ्याच्या तक्रारीवरही तितक्याच गांभीर्याने आणि तत्परतेने कारवाई व्हायला हवी. अन्यथा न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. या संपूर्ण प्रकरणामुळे केवळ पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले नसून ग्रामीण भागातील न्याय आणि समानतेच्या चर्चेलाही नव्याने उधाण आले आहे.
“उंब्रज पोलिसांनी २०२५ मध्ये मी दाखल केलेल्या चोरीच्या गुन्ह्याची वेळेत आणि गांभीर्याने चौकशी केली असती, तर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शेतातील चोरीसारख्या घटना टाळता आल्या असत्या. मी त्याच आरोपीचे नाव संशयित म्हणून स्पष्टपणे दिले होते; मात्र त्यावेळी आवश्यक कारवाई झाली नाही.” “कलिंगड चोरी आणि ऊस जळीत प्रकरणात गेली दोन वर्षे मी न्यायासाठी पोलिस प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहे. प्रगतशील शेतकरी असूनही मला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. दुर्दैवाने माझ्या तक्रारी गांभीर्याने घेण्याऐवजी मला दुर्लक्षित करण्यात आले.”
“माझा एफआयआर २०२५ मधील आहे. त्यावेळी सखोल आणि निष्पक्ष तपास झाला असता, तर अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असता. आता तरी आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याने संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन व्यापक चौकशी व्हावी.”
“शेळी चोरी, सोयाबीन चोरी तसेच परिसरातील इतर चोरीच्या घटनांचाही सखोल तपास करून सत्य बाहेर आणावे, जेणेकरून भविष्यात शेतकरी आणि नागरिकांना अशा गुन्ह्यांना सामोरे जावे लागणार नाही.” अशी माहिती पीडित शेतकरी, पाल (ता. कराड रविंद्र पाटील यांनी दिली.