
खून का बदला खून! दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कुरकुंभजवळ हत्या; परिसरात तणावाचे वातावरण
पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २०) रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास महेश भागवत हा आपल्या साथीदारांसह दुचाकीवरून पाटसकडे परतत होता. मुकदमवाडी उड्डाणपुलावर पोहोचताच पाठीमागून आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते खाली कोसळले. यानंतर हल्लेखोरांनी महेश भागवत याच्यावर कोयता व सत्तूरसारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या भागवतचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्लेखोर मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
या प्रकरणी महेश मारुती टुले यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आनंद माकर, विकी शितकल, संतोष शितकल (रा. आंबिकानगर, पाटस) तसेच अन्य दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध खून आणि जीवघेण्या हल्ल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
दरम्यान, ४ जुलै २०२१ रोजी पाटस येथील तामखडा परिसरात शिवम शितकल आणि गणेश माकर या दोन तरुणांची निघृण हत्या झाली होती. त्या दुहेरी हत्याकांडात महेश उर्फ मन्या भागवत याच्यासह काही जणांवर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संबंधित आरोपी सध्या जामिनावर बाहेर होते. कुरकुंभजवळ झालेल्या या हल्ल्यात त्या जुन्या प्रकरणातील तिघांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी महेश भागवतचा मृत्यू झाला. उर्वरित दोघे जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हत्याकांडाचा सूड उगवला गेला का?
या घटनेमुळे २०२१ च्या दुहेरी हत्याकांडाचा सूड उगवला गेला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाटस आणि परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून, संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.