संग्रहित फोटो
गेल्या आठवड्यात बुधवार पेठेत पुणे पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत झाडाझडती घेतली होती. त्यानंतर तीन दिवसांतच पुन्हा गुप्त माहीतीवरून बुधवार पेठेत कारवाई छापा मारत ११ बांगलादेशी महिलांना पकडले. या महिला काहीच महिन्यांपूर्वी बुधवार पेठ येथे आल्याचे समोर आले. त्यांच्याजवळ बनावट आधार कार्डांसह इतर खोटे कागदपत्रे आढळून आली. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आता पोलिसांनी या महिलांना पुण्यात आणणारे आणि त्यांना कागदपत्रे तयार करून देणारे अश्यांची साखळी उघड केली आहे. तेव्हा पापा शेख याचा सूत्रधार असल्याचे तसेच बांगलादेश सीमेवरील दलालांशी थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. तो दलालांच्या माध्यमातून महिलांना आधी कोलकता येथे आणत होता. तेथून बोगस कागदपत्रांच्या आधारे त्यांना पुण्यात पाठवले जात होते. ब्युटी पार्लर तसेच शिलाई या कामाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलांना फसवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. पण पुण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून जबरदस्तीने देह व्यवसाय करून घेतला जात असल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणातील आरोपी पापा शेखसह सुमित्रा कांबळे, राजेश कलीमनी, रणजीत पात्रा, रूपा शेख हे प्राथमिक तपासानुसार संघटित पद्धतीने मानवी तस्करीचे रॅकेट चालवत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पापा शेख फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पापा शेख सुमारे २० वर्षांपूर्वी बुधवार पेठेतील एका हॉटेलमध्ये काम करत होता. कालांतराने त्याने आपले जाळे निर्माण केले. अवैध धंद्यांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मागील काही वर्षांत त्याने मोठी आर्थिक उलाढाल केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासात पापा शेखच्या तीन पत्नी असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एक महिला बांगलादेशी असल्याची माहिती आहे. बुधवार पेठ परिसरात त्यांचे प्रस्थ असून, महिलांवर दबाव टाकणे व बाहेर पडू न देणे यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.






