
पवनला बोलावून घे, जिवंत सोडणार नाही; भरचौकात चाकू फिरवत तिघा भावांचा धिंगाणा
छत्रपती संभाजीनगर : पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून तिघा भावांनी भर चौकात मोठा चाकू फिरवत गोंधळ घातला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. २४ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास जवाहर कॉलनीतील महिपत पाटील मामा चौकात ही घटना घडली आहे. अजय जितेंद्र कांडे, विर उर्फ लिंबराज जितेंद्र कांडे आणि जय जितेंद्र कांडे (सर्व रा. बालाजीनगर) अशी चाकू घेवून फिरणाऱ्यांची नावे आहेत. आरोपींपैकी अजय व लिंबराज कांडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात यापूर्वी खूनाचा प्रयत्न, गाड्या जाळणे तसेच मारामारीचे पाच ते सहा गुन्हा दाखल असल्याची माहिती जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिली.
चाकू फिरवून दहशत पसरविण्याचा डाव
आरोपींनी ज्या ठीकाणी गोंधळ घातला त्याच ठीकाणी त्यांची गुरुवारी दिनांक २५ रोजी पोलिसांनी धिंड काढली. या प्रकरणात रुपेश शंकरराव पेरकर (३२, रा. अरिहंतनगर, जवाहरनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी हे पवन गळी यांच्याकडे सुमारे वर्षभरापासून कामाला आहेत. ते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कामानिमित्त महिपत पाटील मामा चौकात उभे होते. त्यावेळी अजय कांडे, वीर उर्फ लिंबराज कांडे आणि जय कांडे हे तिघे भाऊ तेथे आले. यातील अजय कांडे याच्या हातात मोठा धारदार चाकू होता. चाकू हवेत फिरवत त्याने परिसरात दहशत निर्माण केली.
हे सुद्धा वाचा : दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?
पोलिसांनी काढली धिंड
पवनच्या सासऱ्याने आमच्या विरोधात तक्रार कशी दिली, त्याला पाहून घेतो. पवन कुठे आहे, त्याला लगेच बोलावून घे, असे म्हणत आरोपींनी रुपेश पेरकर यांना शिवीगाळ केली. त्यानंतर पवन गवळीला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींच्या हातातील चाकू आणि सुरू असलेली आरडाओरड पाहून परिसरातील नागरिक तेथे जमा झाले. या प्रकारामुळे काही काळ चौकात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नागरिक जमा होताच आरोपी तेथून पसार झाले. या प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार वानखेडे करीत आहेत.