
ढाब्यावर काम करणारे बांगलादेशी जेरबंद; 'असा' झाला दोघांचा भांडाफोड
छत्रपती संभाजीनगर : भारत-बांगलादेश सीमा बेकायदेशीररीत्या ओलांडून छत्रपती संभाजीनगरात वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मांडकी शिवारातील इमानदार ढाब्यावर कुक व वेटर म्हणून काम करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व चिकलठाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहम्मद बिलाल मोहम्मद मुकलिस्उद्दीन रेहमान (वय २७) आणि मोहम्मद रासेल मोहम्मद इरशाद अली (१९, दोघे रा. झिनायदा, बांगलादेश, ह.मु. मांडकी शिवार, पळशी) अशी त्यांची नावे आहेत. चौकशीत दोघांनी सुरुवातीला भारतीय नागरिक असल्याचे सांगितले. मात्र, मोबाईलमधील माहिती तसेच बांगलादेश सरकारचे राष्ट्रीय ओळखपत्र व जन्मप्रमाणपत्र तपासल्यानंतर त्यांचे नागरिकत्व उघड झाले.
दलालामार्फत भारतात प्रवेश
बिलाल याने २०१७-१८ च्या सुमारास दलालामार्फत सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला. कोलकाता, मुंबई व छत्रपती संभाजीनगरात काम केल्याचे, तसेच कोविड काळात बांगलादेशात परतल्यानंतर पुन्हा भारतात आल्याचे त्याने सांगितले. रासेल यानेही सुमारे पाच वर्षांपूर्वी भारतात अनधिकृत प्रवेश करून कोलकाता, मनमाड व छत्रपती संभाजीनगर परिसरात काम केल्याचे सांगितले.
परत पाठविण्याची प्रक्रिया राबवणार
दोघांचा भारतातील वास्तव्याचा कालावधी, रोजगार व स्थानिक संपर्काचा तपास सुरू आहे. नागरिकत्वाची अधिकृत पडताळणी करून सक्षम प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, त्यानंतर त्यांना बांगलादेशात परत पाठविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या कर्मचाऱ्यांनी केली कारवाई
भारतात प्रवेशासाठी आवश्यक पासपोर्ट, व्हिसा किंवा अन्य वैध कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, उपनिरीक्षक लहु घोडे, अंमलदार विठ्ठल डोके, सुनील गोरे, संतोष डोंगरे, सनी खरात, संदीप कोळगे, निलेश कुडे तसेच चिकलठाणा ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बनसोडे, उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे, अंमलदार दिपक देशमुख, किशोर काळवणे, गणेश कोरडे, सतीष देवकर आदींच्या पथकाने केली आहे.
हे सुद्धा वाचा : पतीचे पत्नी अन् मुलीवर चाकूने वार, वाकडमधील धक्कादायक प्रकार; धक्कादायक कारणही समोर