
रत्नागिरीत चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडले; शटर उचकटून तब्बल 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल लंपास
सुमित्रा ज्वेलर्सचे मालक किशोर महादेव देवरूखकर (वय ६३, रा. राजेंद्रनगर) यांनी शनिवारी (दि. २८ मार्च) रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद केले होते. रविवारची सुट्टी असल्याने दुकान बंदच होते. सोमवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास जेव्हा ते दुकान उघडण्यासाठी आले, तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश करीत दुकानातील चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. यामध्ये प्रामुख्याने चांदीचे पैंजण सुमारे १ लाख रुपये किमतीचे (१०५० ग्रॅम), चांदीचे ताम्हण ५० हजार रुपये किमतीचे (३१० ग्रॅम), चांदीचे छल्ले २० हजार रुपये किमतीचे (२०० ग्रॅम) या सामानाची चोरी झाली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ५ हजार रुपये किमतीचा हिकव्हीजन कंपनीचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी पळवून नेला आहे. याप्रकरणी किशोर देवरूखकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे अधिक तपास करीत आहेत.
पुराव्यासाठी डीव्हीआर पळवला
चोरटे अत्यंत सराईत असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. आपली ओळख पटू नये आणि चोरीचा कोणताही पुरावा मागे राहू नये, या हेतूने चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज रेकॉर्ड होणारा डीव्हीआर सोबत नेला. मारुती मंदिर सारख्या वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.