टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी (Photo Credit- Social Media)
टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी धीरज बलराज सिंग, राजीव साव आणि आकाशकुमार स्वराजकुमार यांना रविवारी भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस. एम. सुतार यांच्या सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती मोठे पुरावे लागले असून, आरोपींकडून प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळणाऱ्या प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणामागे एक मोठे आंतरराज्यीय रॅकेट कार्यरत असून, अजूनही दोन संशयित आरोपी फरार आहेत. हा पेपर नेमका कुठून बाहेर आला, महाराष्ट्रात त्याची कुठे आणि किती रुपयांना विक्री झाली, यामध्ये कोणते आर्थिक व्यवहार झाले आणि आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी १० दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत आरोपींना ८ दिवसांची (६ जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली.
एक गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी भिवंडी शहरात एका गुप्त ठिकाणी धडक धाड टाकली आणि हा संपूर्ण काळाबाजार उजेडात आणला. या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच होत असल्याचे समोर आले. सुरक्षेतील हा अत्यंत गंभीर प्रकार पाहता, प्रशासनाने तातडीने पावले उचलत २८ जून २०२६ (रविवार) रोजी होणारी TET २०२६ परीक्षा तात्काळ प्रभावाने पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे परीक्षेची वर्षभर तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो प्रामाणिक उमेदवारांना मोठा मानसिक आणि आर्थिक फटका बसला आहे.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी जरी बिहार आणि हरियाणा राज्यांतील असले, तरी या पेपरफुटीची मुख्य पाळेमुळे महाराष्ट्रातच खोलवर रुजलेली आहेत. प्रश्नपत्रिका थेट महाराष्ट्रातील परीक्षा विभागातून किंवा छपाई केंद्रातून बाहेर पडली असल्याने, या रॅकेटचा मुख्य ‘किंगपिन’ राज्यातीलच एखादी अत्यंत प्रभावशाली आणि राजकीय वरदहस्त असलेली व्यक्ती असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ६ जुलैपर्यंतच्या कोठडीदरम्यान पोलीस या बाहेरील राज्यातील आरोपींची कसून चौकशी करणार आहेत. या कालावधीत खालील महत्त्वाच्या प्रश्नांचा शोध घेतला जाईल.






