
किरकोळ वादाचे भीषण रूप! पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने केला जीवघेणा हल्ला
Dharashiv Crime: धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी परिसरातील कनगरा येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (20 मे 2026) सकाळी उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र जगन्नाथ ढोबळे यांनी मंगळवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कौटुंबिक वादाच्या रागातून आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे समोर येत आहे. पत्नीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Punjab Crime: पैशांसाठी मित्रानेच MBBS विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद
या घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मृत महिलेला दोन मुली आणि एक मुलगा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच मागील दहा वर्षांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अधिकृत माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे. हाती आलेली ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून अधिकृत पोलिस तपासानंतर तपशीलात बदल होऊ शकतो.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने धाराशिव जिल्ह्यात मोठी धाडसी कारवाई करत तब्बल ६२ लाख ४८ हजार ६० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू आणि तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. १७ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होते.