युगेंद्र पवार यांच्यासह पुणे जिल्ह्यातील 10 पराभूत उमेदवारांनी केली फेरमोजणीची मागणी (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर जोरदार राजकारण रंगले आहे. निकाल पूर्णपणे महायुतीच्या बाजूने एकतर्फी लागल्यामुळे महाविकास आघाडीने संशय व्यक्त केला आहे. ईव्हीएम मशीन हॅक आणि इतर अनेक गोष्टींवर त्यांनी संशय घेतला जात होता. बारामतीमध्ये निकालावरुन पुन्हा एकदा राजकारण सुरु झाले आहे. युगेंद्र पवार व अजित पवार यांच्यामधील लढतीमध्ये लाखो मतांनी युगेंद्र पवार यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर देखील युगेंद्र पवार यांच्यासह दहा जणांनी फेरमोजणीची मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत मतमोजणीत घोळ झाल्याच्या आरोपानंतर जिल्ह्यातील तब्बल 11 मतदारसंघांतील पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रांची पडताळणी करण्यासाठी अर्ज केला आहे. पुणे जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमधील 11 पराभूत उमेदवारांमध्ये शिरूरमधील अशोक पवार, बारामतीतील युगेंद्र पवार, हडपरसमधील प्रशांत जगताप, चिंचवडमधील राहुल कलाटे, खडकवासलामधील सचिन दोडके, पर्वतीमधील अश्विनी कदम, भोसरीमधील अजित गव्हाणे, तर दौंडमधील रमेश थोरात यांचा समावेश आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंटमधील रमेश बागवे, पुरंदरमधील संजय जगताप व भोरमधील संग्राम थोपटे यांनीही अर्ज केला आहे. हा अर्ज करताना संबंधित मतदारसंघामधील एकूण मतदान केंद्रांच्या 5 टक्के केंद्रांच्या यंत्रांची पडताळणी केली जाते. ही यंत्रे उमेदवाराकडून सुचविली जातात. या मतदान केंद्रातील यंत्रांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येकी 42 हजार 500 रुपये अधिक 18 टक्के जीएसटी आकारून एकूण 47 हजार 200 रुपये आकारले जातात. त्यानुसार या सर्व उमेदवारांनी 64 लाख 66 हजार 400 रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा केले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या अर्जांनंतर 45 दिवसांच्या न्यायालयीन याचिकेचा कालावधी संपल्यानंतर, अर्थात 6 जानेवारीनंतर संबंधित यंत्रांमधील मतांची माहिती नष्ट केली जाईल. त्यानंतर मॉकपोलच्या आधारे 1 हजार 400 मतांची पडताळणी करून यंत्रांची सत्यता पडताळली जाईल, असे जिल्हा निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरमतमोजणी व्हावी यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतमोजणीवेळी एखाद्या उमेदवाराने दोन तासांच्या आत आक्षेप घेतल्यास फेरमतमोजणी घेण्यात येते. त्यानंतर आक्षेप आल्यास व उमेदवार न्यायालयात गेल्यास फेरमतमोजणी घेण्यात येते. त्यासाठी सर्व मतदान यंत्रांमधील मतांची माहिती (डेटा) ४५ दिवसांसाठी सुरक्षित ठेवला जातो. मात्र, त्यानंतर मतदान यंत्रांच्या सत्यता पडताळणीबाबत आक्षेप आल्यास न्यायालयीन प्रक्रियेसाठी राखून ठेवलेल्या 45 दिवसांनंतर संबंधित मतदान यंत्रांमधील माहिती नष्ट करून नवे चिन्ह टाकून १ हजार ४०० मते टाकून मॉकपोल घेतला जातो. त्यात व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. त्यात कोणत्या चिन्हाला किती मते मिळाली याची पडताळणी केली जाते.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
न्यायालयीन प्रक्रियेचा ४५ दिवसांचा कालावधी येत्या ६ जानेवारीला संपत आहे. त्यामुळे ही पडताळणी त्यानंतरच होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. उमेदवारांचा पडताळणीसाठी अर्ज आल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला कळविण्यात येते. त्यानंतर या कार्यालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घेतली जाते. पडताळणी वेळी आयोगाकडून यंत्र उत्पादक कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल लि.च्या अभियंत्यांचे पथक, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे पथक व प्रत्यक्ष उमेदवाराच्या उपस्थितीत ही पडताळणी केली जाते.
उमेदवार मतदारसंघ यंत्रांची संख्या भरलेले शुल्क
अशोक पवार (12 शिरूर मतदारसंघ ) ५, ६६. ४०० रुपये
प्रशांत जगताप ( 27 हडपसर मतदारसंघ ) १२, ७४,४०० रुपये
रमेश बागवे (09 पुणे कॅन्टोन्मेंट ) ४,२४,८०० रुपये
राहुल कलाटे (25 चिंचवड) ११, ८०, ००० रुपये
सचिन दोडके (02 खडकवासला) ९४, ४०० रुपये
युगेंद्र पवार (19 बारामती) ८,९६,८०० रुपये
अश्विनी कदम ( 02 पर्वती) ९४, ४०० रुपये
अजित गव्हाणे (10 भोसरी) ४,७२,००० रुपये
संजय जगताप (21 पुरंदर) ९,९१,२०० रुपये
संग्राम थोपटे (06 भोर) २,८३,२०० रुपये
रमेश थोरात (04 दौंड) १,८८,८०० रुपये
एकूण ११ उमेदवारांनी ६४ लाख ६६ हजार ४०० रुपये भरले आहेत.