
फोटो सौजन्य - Social Media
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘Lagnanantar Hoilach Prem’ सध्या अत्यंत भावनिक वळणावर पोहोचली आहे. जीवा आणि नंदिनी यांच्या आयुष्यातील संघर्ष, मातृत्वाची ओढ आणि त्यासाठी सुरू असलेली धडपड प्रेक्षकांना भावूक करत आहे. एकीकडे काव्या आणि पार्थ यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागली आहे, तर दुसरीकडे नंदिनीला आई होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याने ती मानसिक संघर्षातून जात आहे. मातृत्वाच्या प्रवासात वारंवार आलेल्या अडचणींमुळे जीवा आणि नंदिनी यांनी अखेर सरोगसीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या निर्णयानंतर मालिकेच्या कथानकात एका नव्या व्यक्तिरेखेची एण्ट्री होणार असून त्यामुळे कथेला नवे वळण मिळणार आहे.
लोकप्रिय अभिनेत्री अनघा अतुल आता या मालिकेत डॉ. आर्या या भूमिकेत दिसणार आहे. संवेदनशील, समजूतदार आणि सकारात्मक विचारांची ही व्यक्तिरेखा जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांच्यासोबत उभी राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या मातृत्वाच्या प्रवासात कोणते बदल घडतील, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेता या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अनघा जवळपास तीन वर्षांनंतर पुन्हा स्टार प्रवाहवर परतत आहे. या नव्या भूमिकेबद्दल बोलताना तिने स्टार प्रवाहसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. खलनायिकेच्या भूमिकेनंतर सकारात्मक व्यक्तिरेखा करण्याची इच्छा होती आणि डॉ. आर्याच्या रूपाने ती पूर्ण झाल्याचे तिने सांगितले.
अनघाने मालिकेच्या लोकप्रियतेचेही कौतुक केले. प्रवासादरम्यान अनेक महिला मोबाईलवर ही मालिका पाहताना दिसतात, असे सांगत ती स्वतःही मालिकेची नियमित प्रेक्षक असल्याचे म्हणाली. त्यामुळे आपल्या आवडत्या मालिकेत काम करण्याची संधी मिळणे तिच्यासाठी विशेष असल्याचे तिने नमूद केले.
आता डॉ. आर्याच्या आगमनामुळे जीवा-नंदिनीच्या आयुष्यात नेमके काय बदल घडणार, त्यांचे मातृत्वाचे स्वप्न पूर्ण होणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका दररोज सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.